
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चिकटवले निवेदन
बदलापूर, ता. २६ (बातमीदार) : बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमानीचे काम हे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहे. या कमानीसाठी सातत्याने मागणी करूनही कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ अखेर मंगळवारी (ता. २५) सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीलाच निवेदन चिकटवून अनोखे आंदोलन करण्यात आले. मंगळवारी दुपारी संतोष रायजाधव, अरुण चव्हाण, राजू लाड, संभाजी शिंदे, संजय जाधव, सुहास पोखरकर, गिरीश राणे, अविनाश देशमुख, अवधूत चव्हाण, सुधीर देशमुख, राम जगताप, सदानंद भोईर या सकल मराठा समाजातील कार्यकर्ते व इतर नागरिकांनी घोषणाबाजी करत नगर परिषद कार्यालयात प्रवेश केला. मात्र त्यावेळी मुख्याधिकारी योगेश गोडसे हे पालिकेत अनुपस्थित असल्याने उपमुख्याधिकारी विलास जड्ये यांनी प्रशासक दालनात येऊन निवेदन स्वीकारले. हे निवेदन देण्यापूर्वी प्रशासकाच्या खुर्चीला चिकटवण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले.