
बदलापुरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई
बदलापूर, ता. २९ (बातमीदार) : शहरात स्थानक परिसरात पदपथ आणि रस्त्यावर बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांना ३० एप्रिलपर्यंत हटवा; अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा, अशा आशयाचे फलक मनसेने लावण्यात आले होते. त्यानंतर २४ तासांतच कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या वतीने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे बाजारपेठेने काहीअंशी आता मोकळा श्वास घेतला आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानकापासून दीडशे मीटरपर्यंतच्या आवारात फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला आहे; मात्र बदलापूर स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही परिसरात फेरीवाले बस्तान मांडत आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, तरीही फेरीवाले पुन्हा अतिक्रमण करतात. त्यामुळे पालिकेच्या अशा थातुरमातुर कारवाईमुळे नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत कारवाई न केल्यास १ मेपासून आक्रमक भूमिका घेण्यात येईल, अशी भूमिका मनसेने घेतली होती. त्यानंतर प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
कोरोना महामारीनंतर अनेकांनी उदरनिर्वाहासाठी फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू केला. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली जागा देण्यात येणार आहे. या जागेचे काम सुरू आहे; मात्र स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येते.
- योगेश गोडसे, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगर परिषद