
वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाड्यासाठीही एपीएमसीची मागणी
वाडा, ता. २९ (बातमीदार) : प्रयोगशील शेतीचा वारसा असलेल्या वाडा तालुक्यासह विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून या तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी आघाडीचे राज्य सरचिणीस डॉ. हेमंत सवरा यांनी केली आहे. या भागातील शेतकऱ्यांशी सबंधित प्रश्न घेऊन लवकरच सहकामंत्री अतुल सावे यांची भेट घेणार असल्याची माहिती डॉ. हेमंत सवरा यांनी दिली. वाडा तालुका हा शेतिप्रधान तालुका आहे. वाडा कोलमसारख्या जगविख्यात तांदळाचे संशोधन वाड्यात झाले. अनेक शेतितज्ज्ञ पालघर जिल्ह्यात कार्यरत आहेत; तर मोठ्या प्रमाणात वन अधिकार मिळवणारे आदिवासी शेतकरी शेती आणि नगदी पिके घेत आहेत. विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागातही आदिवासी शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करत शेतमाल पिकवत आहेत. यांच्यासाठी बाजारपेठ नसणे ही मोठी अडचण आहे.