
राज्य सरकारकडे ३९०० कोटींची मागणी
मुंबई, ता. २९ : मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा थोपवण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले. कोरोना साथ नियंत्रणासाठी पालिकेने आपल्या निधीतून खर्च केले. हा निधी मिळावा, यासाठी पालिकेने आता राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार उपजिल्हाधिकारी शहर आणि उपनगर यांच्याकडे सुमारे तीन हजार ९०० कोटी रुपयांची मागणी पालिकेने केली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार २३ इतकी झाली आहे. पालिकेच्या आरोग्य खात्याने कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहावी, रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, पहिल्या लाटेपासून पालिकेने स्वतःच्या निधीतून कोरोना नियंत्रणात येईपर्यंत खर्च केला. हा खर्च सुमारे ३ हजार ९०० कोटींच्या घरात गेला आहे. या खर्चापैकी जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी ११४१.९४ कोटी रुपये द्यावेत आणि जिल्हाधिकारी उपनगर यांनी ११५८.११ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी पालिकेने केली आहे.
निधी मिळाल्यास उपाययोजना
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भविष्यात कोरोना रुग्ण आणखी वाढल्यास या साथीला प्रतिबंध करण्यासाठी निधीची गरज भासणार आहे. राज्य सरकारकडून हा निधी मिळाल्यास पालिकेलाही कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करता येतील. यंत्रसामुग्री खरेदी करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.