
पालघरमध्ये गरजला जय महाराष्ट्र
वसई, ता. १ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळाली. या वेळी सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यात ‘जय जय महाराष्ट्र’ आवाज निनादत होता.
पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत महाराष्ट्र दिनानिमित्त विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी अनेक कार्यक्रम राबवले. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, तसेच महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगणाऱ्या मान्यवरांचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, वसई-विरार महापालिकेने विविध मान्यवरांचा सत्कार केला. विविध शासकीय विभागांत उपक्रम राबवण्यात आले होते. पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शासकीय आणि सार्वजनिक ठिकाणी अत्यंत शांततेत कार्यक्रम पार पडले.