रेल्वेला महाराष्ट्र दिनाचा विसर?

रेल्वेला महाराष्ट्र दिनाचा विसर?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : दरवर्षी मध्य रेल्वेकडून महाराष्ट्र स्थापना दिवसानिमित्त उपनगरीय रेल्वे स्थानकांत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीत वाजवले जायचे; परंतु यंदा अनेक स्थानकांत हे महाराष्ट्र गीत ऐकूच आले नाही. त्यामुळे रेल्वेला महाराष्ट्र दिनाचा विसर पडला का, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापना दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत वाजवून प्रवाशांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा रेल्वेकडून देण्यात आल्या; परंतु दरवर्षी महाराष्ट्र दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून उपनगरीय स्थानकांत महाराष्ट्र गीत लावले जात होते. यंदा मात्र उपनगरीय स्थानकांवर महाराष्ट्र गीत ऐकू येईल, अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांना होती. सीएसएमटी स्थानक सोडले, तर इतरही स्थानकांत गीत ऐकू आले नाही. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचा ट्विटर अकाऊंटवर फक्त शुभेच्छा संदेश देण्यात आले. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे कार्यक्रम रेल्वेकडून घेण्यात आले नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या कारभारावर प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुख्य स्थानकांत आम्ही महाराष्ट्र गीत वाजवले, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
...
सोशल मीडियावर नाराजी
पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर महाराष्ट्र राज्य गीत का वाजवले जात नाही, पश्चिम रेल्वेच्या अमराठी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र गीताचे वावडे आहे का, असा प्रश्न ॲड. प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रेल्वेला विचारला आहे. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी रेल्वे राज्य मंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी केली आहे. अनेकांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या या कारभारावर समाज माध्यमावर नाराजी व्यक्त केली आहे. मराठी एकीकरण समितीनेसुद्धा ट्विटरच्या माध्यमातून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला सर्व स्थानकांवर महाराष्ट्र राज्य गीत वाजले पाहिजे. तशा दोन्ही रेल्वेला सूचना देण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
...
महाराष्ट्र शासनाचा राज्यातील रेल्वेवर वचक राहिला नाही. मुंबईतील मराठी माणसाकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही. दरवर्षी महाराष्ट्र गीत सर्व रेल्वेस्थानकांत वाजत होते; परंतु यंदा अनेक रेल्वेस्थानकांत महाराष्ट्र गीत वाजले नाही. आम्ही रेल्वेच्या या कारभाराचा निषेध व्यक्त करतो. आम्ही संघटना म्हणून रेल्वेला यासंदर्भात जाब विचारणार आहोत.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ
...
मध्य आणि पश्चिम रेल्वर वरिष्ठ अधिकारी बाहेर राज्यांतून येतात. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्र राज्याचे उत्सव त्यांना माहीत नसतात. त्यामुळे महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक स्थानकांत आज महाराष्ट्र गीत वाजले नाही, हे दुर्दैवी आहे. आम्ही रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करतोय, महाराष्ट्र राज्यातील स्थापना दिवस आणि उत्सव साजरे करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना समज द्यावी.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
...
राज्यमंत्री, रेल्वे विभाग आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून रेल्वेचे वेळीच कान पिळणे गरजेचे आहे. मध्य, पश्चिम रेल्वे महाराष्ट्रात सेवा देत आहेत, तर महाराष्ट्राच्या भाषेचा, महाराष्ट्राच्या नागरिकांचा सन्मान करणे आवश्यक आहे.
- गोवर्धन देशमुख, अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती
...
पश्चिम रेल्वेला महाराष्ट्र दिनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. रेल्वेच्या या कारभाराचा निषेध करतो.
- कपिल घायवट, मराठी भाषाप्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com