
एकजुटीने लढा देण्याची गरज
वडाळा, ता. २ (बातमीदार) ः केंद्र सरकारचे कामगारविरोधी धोरण व चार लेबर कोडचे विधेयक मंजूर केल्यामुळे मालक सुरक्षित; तर कामगार असुरक्षित झाला आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी कामगार चळवळ आता राजकीय चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेत्यांनी केले आहे. सोमवारी (ता. १) कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात जाहीर सभा पार पडली. या वेळी विविध नेत्यांनी कामगार संघटनांच्या एकजुटीचा नारा दिला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या प्रोत्साहनाने आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या सहकार्याने हा समारंभ पार पडला. दरम्यान कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगार दिनानिमित्त सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने परेल रेल्वे स्थानक पूर्व ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात सभेत रूपांतर झाले.
या सभेत कामगार नेत्यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन, कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केंद्रीय कामगार संघटनांनी वर्षभर आंदोलन करण्याचे आयोजन केले आहे. तीन महिन्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध प्रचंड मोर्चा काढला जाईल. शेतकऱ्यांनी एक वर्ष संघर्ष करून केंद्र सरकारला कायदे मागे घेण्यास भाग पाडले. कामगारांनीदेखील अशा प्रकारे एकजुटीने लढा दिला पाहिजे. असंघटित कामगारांना संघटित केल्याशिवाय कामगारांना न्याय मिळणार नाही. त्यासाठी संघटित क्षेत्रातील सर्वच कामगार नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची काळाची गरज असल्याचे या वेळी सांगितले गेले.
या वेळी महाराष्ट्र हिंदू मजदूर सभेचे अध्यक्ष शंकर साळवी, जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, खजिनदार निवृत्ती धुमाळ, कल्पना देसाई, अशोक जाधव, कॉ. एम. ए. पाटील आदी मान्यवर कामगार नेत्यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.