
अपघातातील रिक्षा पेटल्याने महिला ठार
ठाणे, ता. ३ (वार्ताहर) ः ट्रकने दिलेल्या धडकेमुळे दुभाजकावर आदळून पेट घेतलेल्या रिक्षात अडकल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना गायमुख पोलिस चौकीजवळ बुधवारी (ता. ३) पहाटे पावणे सहाच्या सुमारास घडली.
राजेश यादव हा रिक्षाचालक एका महिला प्रवाशाला घेऊन घोडबंदरकडे निघाला होता. रिक्षाचालक राजेश हा वाहतुकीच्या विरूद्ध दिशेने रिक्षा चालवत होता. गायमुख पोलिस चौकीजवळ आले समोरून आलेल्या ट्रकवर रिक्षा आदळला. या धडकेत रिक्षा उडून दुभाजकावर आदळली. त्यामुळे रिक्षाने पेट घेतला. जखमी झालेला राजेश रिक्षाच्या बाहेर पडला. पण, महिला रिक्षातच अडकून पडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक भरत मुन्नीलाल चौरसिया याच्या जबाबावरून ही हकीकत पोलिसांनी सांगितली. रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी दिली. मयत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. सदर महिला ही ३ मे रोजी रेल्वेने मंगलोर ते मुंबई या गाडीने ठाणे येथे सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उतरली होती. ठाणे स्टेशन येथून रिक्षाने बोरिवली (पूर्व) मुंबई येथे जाण्यास ती निघाली होती. पोलिस तिच्या प्रवासाच्या तिकिटावरून ओळख पटवण्याचे आणि तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम करीत आहेत. महिलेचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष इतके आहे. तिने गुलाबी रंगाचे टी-शर्ट व पॅन्ट असा पेहराव केला असून तिच्या खांद्यावर बॅग होती.