मिठी नदीतील ४९ टक्के गाळाचा उपसा

मिठी नदीतील ४९ टक्के गाळाचा उपसा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मिठी नदीच्या सफाईचे काम वेगात असून गेल्या दोन महिन्यांत ४९ टक्के गाळाचा उपसा करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. येत्या ३१ मेपर्यंत मिठी नदीच्या १०० टक्के सफाईचे उद्दिष्ट आहे. नदीच्या सफाईचे काम वेळेत न झाल्यास आजूबाजूच्या वस्त्यांना धोका उद्‍भवू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

गेल्या दोन महिन्यांत नदीतून ४९.२८ टक्के गाळाचा उपसा करण्यात आला. ३१ मेअखेरपर्यंत उर्वरित ५० टक्के गाळ काढण्याचे म्हणजे एकूण १०० टक्क्यांचे उद्दिष्ट पालिका प्रशासनापुढे आहे. नदीचे सफाईचे काम पूर्ण न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात कुर्ला पश्चिमेकडील क्रांती नगर, संदेश नगर, बैल बाजार इत्यादी परिसरातील नागरिकांना धोका निर्माण होणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला की मिठी नदीच्या पातळीत वाढ होते आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना धोका उद्‍भवतो. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामासह मिठी नदीतील गाळ उपसला जातो. यंदाही नदीतील गाळ काढण्यासाठी दोन वर्षांसाठी ८३ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. यंदा ६ मार्चपासून नालेसफाईच्या कामांसह मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली; मात्र दोन महिन्यांत फक्त ४९.२८ गाळ काढण्यात आला. आता पुढील २५ दिवसांत उर्वरित ५० टक्के गाळ उपसा करण्याचे आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे.

रोज ४ हजार ७०० टन गाळाचा उपसा
मिठी नदीतून रोज ४ हजार ७०० टन गाळ काढण्यात येतो. तो वाहून नेण्यासाठी रोज ३०० डंपरच्या फेऱ्या होतात अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. गाळ उपसा करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व मशीन लावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नालेसफाईची टक्केवारी
शहर ः ५९.५० टक्के
पूर्व उपनगर ः ७३.७७ टक्के
पश्चिम उपनगर ः ७०.१४ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com