
भिवंडीत नालेसफाई युध्दपातळीवर
भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : पावसाळ्यात शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचून, पूर परिस्थिती निर्माण होते. याला आळा बसावा यासाठी पावसाळ्यापूर्वीच शहरातील नाले, गटारांची साफसफाई युद्धपातळीवर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिले आहेत. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांची नुकतीच एक बैठक पार पडली. त्यानुसार शहरातील नाले व गटार सफाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त दीपक झिंजाड आदी अधिकारी व बांधकाम विभागातील अभियंता उपस्थित होते.
म्हसाळ यांनी सांगितले की, शहरामध्ये प्रभाग समितीनिहाय पुराचे पाणी भरण्याची ठिकाणे पाहून सर्वप्रथम पोकलनद्वारे तेथील नाले, गटारांतील गाळ, कचऱ्याची साफसफाई करून काढलेल्या गाळाची तात्काळ विल्हेवाट लावावी, सखल भाग व उंच डोंगरावरील भागामध्ये ज्या ठिकाणी भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या मागील घटना पाहून अशा ठिकाणांवर आवश्यक ती सफाई आणि ठोस उपाययोजना करून दुर्घटना घडणार नाहीत याची संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य प्रकारे काळजी घ्यावी. तसेच शहरातील विविध ठिकाणचे रस्ते व गटारांवरील तुटलेले चेंबर्स तात्काळ लाऊन घ्यावेत, त्यांचे अगोदरचे व नंतरचे जिओ टॅग फोटो काढून दैनंदिन अहवालासोबत जोडावेत. यासंदर्भात शहरामध्ये कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर निश्चित करून, ठेकेदारांच्या बिलातून अशा रकमांची कपात करण्यात येईल, अशा सूचना वजा इशाराही त्यांनी दिला.