टॅंकर लॉबीचा धंदा तेजीत

टॅंकर लॉबीचा धंदा तेजीत

विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः महापालिकेकडून होत असलेल्‍या पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या वसाहती, भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसलेल्या इमारती तसेच झोपडपट्ट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. हा मुद्दा हेरून टॅंकर लॉबीने या भागात आपला व्यवसाय वाढवला आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या टॅंकर लॉबीची चंगळ सुरू आहे. एक हजार लिटर पाण्याला ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत असून पालिकेच्या पाण्याची राजरोस विक्री होत आहे.
जलबोगदा फुटल्याने गेल्या महिन्यात सर्व मुंबईत पंधरा टक्के पाणीकपात लागू केल्याने टॅंकर लॉबीची सुगी सुरू होती. महिनाभराच्या काळात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहर आणि उपनगराच्या अनेक भागांतील नागरिकांचे जलअभियंता विभागावर मोर्चे धडकत होते. सध्या मुंबईच्या उंचावरील, पाणी पुरवठ्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भागात, झोपडपट्ट्यांत अजूनही पाण्याचा तुटवडा आहे.
मुंबईची तहान भागवण्यासाठी पाण्याची गरज भासत असताना पाणी माफियांचा धंदा तेजीत सुरू आहे. मुंबईतल्या काही झोपडपट्ट्यांत, व्यापारी संकुले, खासगी टँकर माफिया तसेच झोपदीदादा पाणी चोरी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी गळती, पाणी चोरीमध्ये हजारो लिटर पाणी वाया जात असताना हे रोखण्यासाठी पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे.

चेंबूरमध्ये ५० टक्‍के कुटुंबांना टँकरचा आधार
मुंबईतील चेंबूरच्या एम वॉर्डामधील सुमारे ५० टक्के कुटुंबे दररोज पाणी विकत घेतात. पाण्यावर होणारा खर्च हा जवळपास अन्नधान्यांवर होणाऱ्या खर्चाइतकाच आहे. साडेसहा ते दहा हजार रुपये प्रतिमहिना आर्थिक उत्पन्न असलेल्या या कुटुंबांच्या मिळकतीमधला मोठा हिस्सा हा पाणी विकत घेण्यावर खर्च होतो, असे गोवंडी-शिवाजी नगर, मानखुर्दमधील रहिवासी सांगतात. पालिका नव्या जोडण्या देत नसल्याने सामान्यांपुढे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नसल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.

गळती आणि चोरी थांबेना
एकीकडे पाणी माफिया; तर दुसरीकडे पाणीगळतीचे प्रमाणही मोठे आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, असा दावा जल विभागाकडून करण्यात येतो; मात्र पाणी चोरी व गळतीमुळे दिवसाला २८ टक्के पाणी वाया जात असल्‍याचे दिसून येत आहे. वेळेत पाणी न येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे या गोष्टी सर्रास सुरू आहेत. मुंबईत पाणी चोरी व गळती रोखण्यासाठी प्रशासन वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करते, तरीही हे प्रमाण थांबत नसल्याचे पालिका प्रशासनाने मान्य केले आहे.

सुमारे ४० हजार खासगी टॅंकर सक्रिय
महापालिकेच्या टँकरची संख्या सुमारे ९ हजार १८१ आहे; तर खासगी टँकरची संख्या सुमारे ३९ हजार ९९९ एवढी आहे. काही खासगी टँकर मुंबईत सक्रिय आहेत. सर्वाधिक पाण्याची लूट गोवंडी-मानखुर्द, अंधेरी पश्चिम, वडाळा, रे रोड, विक्रोळी, घाटकोपर, साकीनाका, कांदिवली, मालाड, गणपत पाटील नगर, दहिसर येथील झोपडपट्ट्यात केली जात आहे. येथे पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

मुंबईत पाणीगळती, चोरी होत असल्याने ३५ टक्के पाणी वाया जाते, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच सांगितले जाते. अनधिकृतपणे पाणी विकणाऱ्यांची साखळी आहे. हे प्रमाण फक्त झोपडपट्टीतच नाही, तर मोठ्या व्यापारी संकुलांना विकले जाते. प्रशासनाचे संबंधित अधिकारी व दलाल यांचे संगनमत असल्याने हे प्रकार खुलेआम होत असतात.
- सीताराम शेलार, निमंत्रक, पाणी हक्क समिती

मुंबईत पालिकेच्या टॅंकरची संख्या - ९ हजार १८१
खासगी टॅंकरची संख्या - ३९ हजार ९९९
------------------------------
मुंबईला दररोज होणारा पाणीपुरवठा - ३,८०० दशलक्ष लिटर
वाया जाणारे पाणी - ९०० दशलक्ष लिटर
प्रत्यक्ष होणारा पाणी पुरवठा - २,९०० दशलक्ष
-----------------------------------
दलालांचा पाण्याचा दर
१००० लिटर पाणी - ५०० ते ७०० रुपये
१ लिटर पाणी - १ रुपये
पालिकेचा दर -
१००० लिटर पाणी - ५ रुपये
-------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com