गतिरोधकांमुळे कंबरदुखी

गतिरोधकांमुळे कंबरदुखी

वाशी, ता.८ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील गतिरोधकांच्या उंचीचे प्रमाण ठरवून दिलेले असताना शहरात नियमांना हरताळ फासला गेला आहे. यामुळे अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या गतिरोधकामुंळे वाहनचालकांची हाडे खिळखिळी झाली आहेत.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण रहावे, यासाठी रस्त्यांवर ठराविक अंतरावर गतिरोधक बसवले जातात. मात्र, कोणत्या रस्त्यावर गतिरोधक असावेत, याची नियमावली असताना वाहतूक विभागाच्या परवानगीविनाच रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात येत आहेत. नवी मुंबई शहरातील गल्ली बोळातील रस्त्यांसह ठाणे-बेलापूर सारख्या वर्दळीच्या मार्गावर देखील अशाच प्रकारे गतिरोधक बसवले गेले आहेत. या गतिरोधकांवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून रिफ्लेक्टर बसवले जात नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाले, तुर्भे, पावणे गाव येथील गतिरोधकांमुळे अनेकांना कंबर दुखीचा त्रास सुरू झालेला आहे.
--------------------------------------------
अतंर्गत रस्त्यांवर कोंडीची समस्या
तुर्भे येथे एकमेकांना खेटून बांधण्यात आलेल्या गतिरोधकामुळे तुर्भे स्टेशन नजीक नेहमीच वाहतूक कोंडी होते. ऐरोली, दिवा, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूर या परिसरातील अंतर्गत रस्त्यावरील काही गतिरोधकांवर सफेद कलरचे पट्टे मारण्यात आले नसून रात्रीच्या वेळी अपघाताच्या घटना घडत आहेत. तसेच एमआयडीसीमधील दिघा ते रबाळेपर्यंत अर्धवट अवस्थेत असलेल्या कामांच्या ठिकाणी सफेद पट्टे गायब झाल्याने अपघात घडत आहेत.
----------------------------------------------
नियम काय सांगतो?
नियमानुसार ज्या ठिकाणी गतिरोधक आहे, त्या ठिकाणी उजव्या व डाव्या बाजूला गतिरोधक असल्याचा फलक लावणे अनिवार्य आहे. तसेच वाहनचालकांना गतिरोधक असल्याचे समजावे, यासाठी झेब्रा क्रॉसिंगप्रमाणे पट्टेरी रंग देणेही बंधनकारक आहे. असे असताना शहरात या नियमांचा विसर पडला असल्यानेच शहरात किती गतिरोधक आहे, यांची माहितीच नवी मुंबई पालिकेकडे नसल्याचे दिसून येत आहे.
----------------------------------------------
मोटारसायकल खड्ड्यात गेल्यामुळे पहिला हादरा पाठीच्या खालील भागात बसतो. तसेच अन्य स्नायूही दुखावतात. दुचाकीवर बसण्याची चुकीची पद्धत देखील याला जबाबदार आहे.
-डॉ.राहुल ठाकरे, अस्थिरोग तज्ज्ञ
---------------------------------------------
गतिरोधकावर सफेद पट्टे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी गतिरोधक दिसत नाही. त्यामुळे गतिरोधकावरून गाडी उंच उडण्याचा प्रकार घडतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
-राकेश मोकाशी, दुचाकी वाहनचालक
--------------------------------------------
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबईत भिंती रंगवण्याचे काम सुरु आहे. रस्त्यावर देखील साफसफाई करण्यात येत असून झेब्रा क्रॅासिंगच्या ठिकाणी पट्टे मारण्यात येतील.
-संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com