
मिरा-भाईंदर भाजप जिल्हाध्यक्ष बदलणार?
भाईंदर, ता. १० (बातमीदार) : भाजपकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील जिल्हाध्यक्षपदांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदरमधील भाजपचे जिल्हाध्यक्षही बदलण्यात येणार का, यावरून शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपमध्ये गटाच्या राजकारणावरून नवा जिल्हाध्यक्ष कोणत्या गटाचा असेल, याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत.
आगामी निवडणुकांसाठी भाजपकडून जिल्ह्याध्यक्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये नुकतेच बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती, पक्षाची ताकद, जिल्हाध्यक्षांची कामगिरी आदींचा लेखाजोखा घेतला जाणार आहे. त्याप्रमाणे मिरा भाईंदरमधील पक्षाच्या कामगिरीचेही मूल्यमापन केले जाणार आहे. लवकरच या संदर्भात जिल्ह्याची जबाबदारी असलेल्यांकडून, तसेच कार्यकारिणी सदस्यांकडून अहवाल मागवला जाणार आहे. त्यामुळे मिरा भाईंदरमध्ये सध्या कार्यरत असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास पदावर कायम राहणार की त्यांच्या जागी अन्य कोणाची वर्णी लागणार, यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
मिरा-भाईंदर भाजपमध्ये माजी आमदार नरेंद्र मेहता आणि जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास यांचे स्वतंत्र गट आहेत. प्रदेश पातळीवरून दोन्ही गटात समेट करण्याचे भरपूर प्रयत्न झालेत; परंतु दिलजमाई करण्यात अद्याप यश आलेले नाही. रवी व्यास यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीवरूनच भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. मेहता गटाने व्यास यांना जिल्हाध्यक्ष म्हणून मनाने स्वीकारलेले नाही. माजी नगरसेवकांचा सर्वात मोठा गट मेहता यांच्यासोबत आहे. शिवाय प्रदेश पातळीवरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी नरेंद्र मेहता घनिष्ठ संबंध ठेवून आहेत.
दुसरीकडे मेहता गटाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे रवी व्यास यांनी पक्षाची नव्याने बांधणी करून बहुतांश नवे पदाधिकारी नियुक्त केले आहेत. आमदार गीता जैन यांचीही त्यांना साथ मिळत आहे. त्यामुळे पक्षाकडून जिल्हाध्यक्ष पदासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता लागून राहिली आहे.
दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत आत्मविश्वास
दोन्ही गटांकडून यासंदर्भात वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहे. व्यास गटाच्या कार्यकर्त्यांना जिल्हाध्यपद रवी व्यास यांच्याकडेच राहील, असा विश्वास वाटत आहे; तर मेहता गटाच्या कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी उपमहापौर, तसेच मेहता यांचे समर्थक हसमुख गेहलोत यांना जिल्हाध्यक्षपदाचे दावेदार घोषित करून टाकले आहे.