
बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया संथ
उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : राज्य शासनाने निश्चित केलेल्या रेडिरेकनर दरानुसार अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याची प्रक्रिया उल्हासनगर महानगरपालिकेत सुरू केली आहे. मात्र त्यासाठी नगररचना विभागात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने तांत्रिक अधिकारी पाठवण्यात यावेत, अशी मागणी आयुक्त अजीज शेख यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे.
रेडिरेकनर दराचा वाद १७ वर्षांपासून प्रलंबित होता. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ यांनी संपूर्ण शहरातील बांधकामांचा रेडिरेकनर दर हा २२०० रुपये प्रतिचौरस मीटर जाहीर केला आहे. ही माहिती देण्यासाठी आणि बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणण्याकरिता विकसक, बिल्डर, वास्तुविशारद यांच्यासोबत दोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद मिळू लागला आहे. मात्र बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया हाताळण्यासाठी मनुष्यबळ कमी पडणार आहे. या घडीला नगररचना कार्यालयात काही जागा रिक्त आहेत. तसेच अर्ज हे प्रभागनिहाय मागवले जाणार आहेत. त्यामुळे शहरात असलेल्या चार प्रभागात तांत्रिक अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे, असे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले.
पावणेदोन लाख धारकांना नोटिसा
बांधकामे नियमित करण्यासाठी एक लाख ८७ हजार बांधकाम धारकांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून त्यापैकी ११५ जणांनी त्यांचे बांधकाम नियमित केले आहे.