मुंबई बातम्या

मुंबई बातम्या

ग्रामीण कथाकार काकडे यांच्या
‘कुकडीचे पाणी’ आत्मचरित्राचे प्रकाशन
वडाळा, ता. १३ (बातमीदार) ः पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावचे सुप्रसिद्ध ग्रामीण कथा कादंबरीकार द. स. काकडे यांचे लेखन ग्रामीण जीवनावर आधारित असून, तत्कालीन जीवनसंदर्भ त्यांच्या कादंबरीत असतात, असे प्रतिपादन ‘मराठी बाणा’फेम अशोक हांडे यांनी केले. शब्दरत्न प्रकाशनच्या वतीने द. स. काकडे यांच्या ‘कुकडीचे पाणी’ आत्मचरित्राचे व दीपलक्ष्मी तांबे लिखित ‘मी आणि माझ्या कविता’ प्रथम काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (ता. ११) प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी सभागृहात अशोक हांडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
ज्येष्ठ व्याख्याते, साहित्यिक व सेवानिवृत्त पोलिस अधिकारी धनंजय वंजारीही सोहळ्यास उपस्थित होते. ते म्हणाले, की १९७० ते २०२३ पर्यंत द. स. काकडे यांची २०० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र, ते प्रकाशन सोहळ्याच्या प्रसिद्धीपासून नेहमीच लांब राहिले. ‘कुकडीचे पाणी’ आत्मचरित्रातून आत्मदर्शन देणारे पुस्तक निर्माण झाले आहे. स्तंभलेखक संजय नलावडे यांनी द. स. काकडे यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले. या वेळी समाजसेविका व माजी नगरसेविका सुनीता शिंदे यांनी प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. लेखक द. स. काकडे, कवयित्री दीपलक्ष्मी तांबे आणि पूर्णिमा तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. बालकलाकार समय तांबे यांनी काकडे यांच्या भूमिकेत जाऊन प्रास्ताविक भाषण केले. तरुण कलाकार उदित पाटील यांनी ‘कुकडीचे पाणी’चे संक्षिप्त वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ सोहनी यांनी केले.

वरळीत साकारणार ‘रणांगण मावळा’चा स्वराज्यपट
प्रभादेवी, ता. १३ (बातमीदार) : शालेय विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवता यावा यासाठी वरळीत ‘रणांगण मावळा’ स्वराज्यपटाच्या माध्यमातून एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा सेनेच्या वतीने रविवारी (ता. १४) वरळीतील सुनीता नलावडे मैदानात ‘रणांगण मावळा’ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे.
स्पर्धेसाठी २५ बाल खेळाडूंचे पाच गट तयार करण्यात आले आहेत. सापशिडीप्रमाणे असलेल्या या खेळात सहभागी मुलांना राज्यातील ३५० किल्ल्यांचा इतिहास जाणण्याची संधी मिळणार आहे.
अत्यंत मनोरंजक आणि ऐतिहासिक असलेल्या अशा खेळाचे मुंबईत प्रथमच आयोजन केले जात असल्याचे आयोजक युवा विभाग अधिकारी संकेत सावंत आणि युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com