कालबाह्य बदल्यांमुळे कामांना विलंब

कालबाह्य बदल्यांमुळे कामांना विलंब

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : शासनाच्या प्रशासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची साधारणतः तीन वर्षांमध्ये बदली होते. मात्र भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा गेल्या काही वर्षांपासून सावळागोंधळ सुरू असून मुदतीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्याचबरोबर नवीन नियुक्ती करताना सेवाज्येष्ठता, अथवा त्याच्या मूळपदाचाही विचार केला जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या कामाला विलंब होत असून प्रशासकीय पातळीवरील महत्त्वाची धोरणात्मक कामे रखडली आहेत.
भिवंडी महापालिकेच्या आस्थापना विभागामार्फत प्रत्येक प्रभागातील आणि मुख्य कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तीन वर्षांनंतर बदली होणे अपेक्षित आहे. मात्र अशा बदल्यांचे प्रमाण कमी असून मर्जीतील लोकांना कायम तेथेच ठेवण्यात आले आहे. भिवंडी महापालिकेचे पाच प्रभाग असून त्या ठिकाणी प्रभारी प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्त केलेले कर्मचारी सफाई कामगार, अथवा लिपिक असल्याचे आढळून येतात. गेल्या काही वर्षांपासून अशा जबाबदारीच्या पदावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांची ४ ते ८ महिन्यांत बदली केली जाते. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा जोर वाढला आहे.
प्रभाग समिती कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेले सुदाम जाधव यांना सुरक्षा रक्षक अधिकारीपदी बसविले ठेवले होते. प्रभाग समिती १ चे अधिकारी दिलीप खाने यांची निवृत्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी सुदाम जाधव यांची सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग समिती ३ मधील रमेश थोरात यांच्या जागी सोमनाथ सोष्टे यांची नियुक्ती केली आहे. सहा. आयुक्त बाळाराम जाधव यांची बदली आस्थापना विभागात करून त्यांच्या जागी निवडणूक विभागाचे गिरीश घोष्टेकर यांची नियुक्ती केली. सहायक आयुक्त राजू वरळीकर यांच्या जागी विधी अधिकारी अनिल प्रधान यांची नियुक्ती झाली आहे. वास्तविक अनिल प्रधान हे मनपाचे सचिव असून ते विधी अधिकारी म्हणून काम करीत आहेत. ते नेहमी कोर्टाच्या कामात व्यस्त असताना त्यांची प्रभाग कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून बदली झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
.....
आयुक्तांच्या आदेशानंतर निर्णय
या प्रकरणी मनपा आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ हे गेल्या तीन दिवसांपासून मनपा कार्यालयात व कार्यालयाबाहेरील शासकीय मिटिंगमध्ये व्यस्त असल्याने नागरिकांना व पत्रकारांना भेटले नाहीत; तर आयुक्तांनी बदलीचे आदेश दिल्यानंतर त्यांचे आदेश बजावले जातात, अशी माहिती आस्थापना प्रमुख बाळाराम जाधव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com