उत्तनमधील शेकडो घरांवर टांगती तलवार

उत्तनमधील शेकडो घरांवर टांगती तलवार

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : उत्तन येथील चौक, डोंगरी, भाटे बंदर, तसेच धावगी येथील सरकारी, तसेच गायरानाच्या जमिनींवर बांधण्यात आलेल्या शेकडो घरांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. केलेले अतिक्रमण शासनाच्या कोणत्याही धोरणानुसार संरक्षित होत असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे तीस दिवसांत सादर करा, अन्यथा अतिक्रमणे हटवण्यात येतील, असे या नोटिसांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये राज्य सरकारने सर्वांसाठी घरे या योजनेत बेघरांनी निवासी प्रयोजनासाठी शासकीय जमिनी तसेच गायरानाच्या जमिनींवर केलेली अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर न्यायालयाने गायरान जमिनींवर झालेली सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश ऑक्टोबर २०२२ मध्ये दिले आहेत. या वर्षअखेर ही अतिक्रमणे हटवायची आहेत. शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार उत्तनमधील चौक, डोंगरी, भाटे बंदर, तसेच धावगी येथे असलेल्या शासकीय जमिनी, तसेच गायरानाच्या जमिनींवर बांधण्यात आलेल्या शेकडो घरांना अतिरिक्त तहसीलदारांनी नोटिसा बजावल्या आहेत.

---------------
अतिक्रमण स्वतःहून काढावे
शासकीय जमीन व गायरानावर झालेले अतिक्रमण शासनाच्या कोणत्याही धोरणानुसार अथवा तरतुदीनुसार संरक्षित होत असेल तर त्यासंबंधीची कागदपत्रे अतिरिक्त तहसीलदार कार्यालयात नोटीस मिळाल्यापासून तीस दिवसांत सादर करण्यात यावीत. ही कागदपत्रे नमूद कालावधीत सादर न केल्यास झालेले अतिक्रमण नोटीस मिळाल्यापासून साठ दिवसांत काढून टाकावे व जमिनीचा ताबा महसूल विभागाकडे द्यावा. तसे न केल्यास हे अतिक्रमण शासकीय खर्चाने हटवण्यात येईल व त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असे या नोटिसांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या नोटिसा मिळाल्यानंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

------------
नोटिसा कशासाठी?
२०१० मध्येदेखील अशा प्रकारच्या नोटिसा गावकऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर गायरानच्या जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दुसरीकडे सरकारी जागेवरील २००० पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. असे असताना उत्तन परिसरात पिढ्यानंपिढ्या असलेल्या जुन्या घरांना पुन्हा नोटिसा कशासाठी बजावण्यात आल्या आहेत, असा सवाल मच्छीमारांचे नेते बर्नड डिमेलो यांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com