
तळोज्यातील वायूप्रदूषण रडारवर
खारघर, ता. १६ (बातमीदार) : तळोजा औद्योगिक क्षेत्रातून सोडल्या जाणाऱ्या वायूमुळे प्रदूषण होत असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रसायनांच्या उग्रवासामुळे मळमळ, चक्कर येणे, श्वास घेण्याचे प्रकार होत आहेत. गेल्या महिनाभरापासून रात्री बारानंतर हा प्रकार सुरू असल्याने अखेर तळोजा फेज दोनमधील वसाहतीत मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र उभारण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
तळोजा एमआयडीसीमधून रात्री बारानंतर हवेत रसायने सोडली जात आहेत. या रसायनांच्या उग्र वासामुळे तळोजा, नावडे, रोडपाली, खारघर परिसरातील नागरिकांची रसायनंच्या उग्र वासाने झोपमोड होत असल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये (ता. ११) प्रसिद्ध झाली होती. यावेळी अनेक वेळा तक्रार करूनही प्रदूषण महामंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. दरम्यान, सोमवारी (ता.१५) प्रदूषण महामंडळाच्या वतीने तळोजा फेज दोनमधील केदार सोसायटीलगत वायुप्रदूषणाचे मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या रसायनाच्या उग्र वासाविरोधात प्रदूषणकारी कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच प्रदूषणाचे मोजमाप करणारे यंत्र उभे करून नागरिकांची दिशाभूल करू नये, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
---------------------------
तळोजा वसाहतीत १५ दिवस वाहन उभे करून दैनंदिन प्रदूषणाचे मोजमाप केले जाणार आहे. तसेच मिळालेल्या तपशीलानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.
- सचिन आडकर, तळोजा विभागीय अधिकारी, प्रदूषण महामंडळ, नवी मुंबई