स्वायत्त महाविद्यालयांच्या आढाव्याकडे दुर्लक्ष

स्वायत्त महाविद्यालयांच्या आढाव्याकडे दुर्लक्ष

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : स्वायत्ततेच्या नावाखाली राज्यात काही वरिष्ठ महाविद्यालयांचा मनमानी कारभार आणि त्यातून विद्यार्थ्यांची होणारी कोंडी सोडविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा सर्वंकष आढावा घेण्याची घोषणा केली होती; मात्र त्यात उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. पाटील यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आल्याने सहा महिन्यानंतरही स्वायत्त महाविद्यालयांच्या आढाव्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याचे दिसून आले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अनेक बाबींवर चर्चा केली होती. उच्च शिक्षणातील गुणवत्ता आणि दर्जावाढीच्या नावाखाली स्वायत्ततेचा दर्जा मिळवलेल्या राज्यातील सर्व महाविद्यालयांची सध्या असलेली शुल्क रचना, त्यांच्यातील शैक्षणिक सुधारणा, गुणवत्तावाढ आदींसंदर्भातील सर्वंकष आढावा घेतला जाईल, अशी घोषणा करत त्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश त्यांनी उच्च शिक्षण विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना दिले होते. त्यावर काही माहिन्यांत कार्यवाही होणे अपेक्षित होते; मात्र सहा महिन्यांनंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

राज्यात सध्या उच्च शिक्षण विभागाकडून ‘नॅक’ मूल्यांकन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांना प्रोत्साहित केले जात आहे. त्यासाठी नुकतीच ‘परिस स्पर्श’ योजना आखण्यात आली; मात्र नॅक मूल्यांकन झाल्यानंतर अनेक महाविद्यालये स्वायत्त दर्जासाठी अर्ज करतात. अशा स्थितीत सध्या राज्यात असलेली १४४ हून अधिक महाविद्यालये स्वायत्ततेचा दर्जा मिळवून आपला स्वतंत्र शैक्षणिक कार्यभार पाहत आहेत. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांकडून केली जाणारी शुल्कवसुली, पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा, तज्ज्ञ शिक्षक, दर्जेदार अभ्यासक्रम तसेच स्वायत्त झाल्यानंतर त्यांच्यातील नेमकी कोणती शैक्षणिक गुणवत्ता वाढ झाली, कोणत्या प्रकारातील संशोधन त्यांनी पुढे आणले आदी कोणतीच माहिती सध्या उच्च शिक्षण विभागाकडे आणि संबंधित विद्यापीठाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या सर्व कामकाजाचा आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिले होते.
दरम्यान, यासंदर्भात उच्च शिक्षणचे प्रभारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

आतापर्यंत आढावाच नाही...
- स्वायत्तता दर्जा मिळवल्यानंतर एकाही महाविद्यालयाचा आतापर्यंत आढावा घेण्यात आलेला नाही
- शुल्कवाढीची प्रक्रिया, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतींचा कोणताही लेखाजोखा उच्च शिक्षण विभागाकडे नाही
- शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जावाढीत कोणती प्रगती केली, याची माहिती उपलब्ध नाही
- गुणवत्तेसाठी नेमके कोणते निकष पूर्ण केले, याचा कुठेही ताळमेळ नाही

मुंबई आणि राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांचा आढावा नुकत्याच झालेल्या मुंबईतील एका बैठकीत घेण्यात आला आहे. त्या संदर्भातील इतर माहितीही घेतली जात आहे. शिवाय नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी त्यांनी करावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

स्वायत्ततेचा दर्जा घेतलेल्या एकाही महाविद्यालयाने गुणवत्तेसाठी कोणते यशस्वी प्रयोग केले हे अजून समोर आलेले नाही. मनमानी शुल्कवाढ आणि वाटेल तसे विषय लादण्याची सक्ती केली जात आहे. अशा सर्व महाविद्यालयांचा सर्वंकष आढावा घेऊन त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
- प्रा. डॉ. वैभव नरवडे, माजी सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com