समृद्धी महामार्गावर ‘इम्पॅक्ट अॅटेन्यूएटर’

समृद्धी महामार्गावर ‘इम्पॅक्ट अॅटेन्यूएटर’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात राज्य सरकारची डोकेदुखी ठरत आहे. अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार परिवहन विभागाच्या वतीने टोलनाक्यांवर वाहनांचे टायर तपासणी केली जात होती. यात अधिक झिज झालेले टायर असलेल्या वाहनांना महामार्गावर प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यानंतरही अपघातांच्या संख्येत घट होत नसल्याने संपूर्ण ७०१ किलोमीटर लांबीच्या महामार्गावर अपघाताची तीव्रता कमी करणारी ‘इम्पॅक्ट अॅटेन्यूएटर’ यंत्रणा टप्प्याटप्प्याने बसवण्याचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे.

११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. त्यात नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांत सुमारे एकूण २५२ अपघात झाले असून, ५० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. समृद्धी महामार्गावरील दोन्ही बाजूचा सुरुवातीचा १०० ते २०० किलोमीटरचा प्रवास अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

महामार्गावर अपघाताची विविध कारणे आहेत. यात चालकाला झोप येणे, लेन कटिंग, मागून पुढच्या वाहनाला धडकणे, वेगमर्यादा ओलांडणे आदी कारणांमुळे अपघात होत आहेत. याच पार्श्वभूमीवर महामार्गावर ‘इम्पॅक्ट अॅटेन्यूएटर’ यंत्रणा लावण्यात येणार आहे. यात वाहनांच्या धडकेमुळे अपघाताची तीव्रता आणि संभाव्य नुकसान कमी होणार असून, महत्त्वाचे म्हणजे जीवितहानी टाळणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारतात प्रथमच...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी एमएसआरडीसी ‘इम्पॅक्ट अॅटेन्यूएटर’च्या रूपाने भारतात प्रथमच अशा प्रणालीचा वापर करत आहे. यामध्ये सुरुवातीला शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या ८० किलोमीटर अंतरात ही यंत्रणा लावण्यात येणार आहे. त्यानंतर नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर मार्गात ही यंत्रणा बसवण्यात येईल. एकूण ७०१ किलोमीटरच्या महामार्गावर या प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाने सांगितले आहे.

वन्यप्राण्यांचा वावर घटला
समृद्धी महामार्गावर वन्यप्राण्यांच्या वावर असल्याने सुरुवातीला अपघातांची संख्या वाढली होती; मात्र एमएसआरडीसीने महामार्गाच्या दोन्ही बाजूला तारेचे फेंन्सिंग केले. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या महामार्गावरील प्रवेशास अटकाव झाला असून, अपघातांच संख्या घटली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com