
शहरातील समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेवर धडक
पालघर, ता. २४ (बातमीदार) : पालघर नगरपरिषद रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, मात्र अनेक वर्षात नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे. नगरपरिषद क्षेत्रातील समस्या व उपाययोजनांबाबत बहुजन विकास आघाडी पालघर शहरातर्फे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना काल (ता. २३) निवेदन देण्यात आले. शहरातील समस्यांबाबत नगरपरिषदेने तातडीने दखल घेऊन कामे मार्गी लावावीत; अन्यथा धरणे आंदोलन करून समस्यांना वाचा फोडण्यात येणार असल्याचा इशारा आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे नगरपरिषदेला देण्यात आला.
पालघर नगर परिषद परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे; मात्र नागरिकांना नगर परिषदेतून अपेक्षित सुविधा मिळत नाही. शहरातील काही प्रमुख रस्ते सोडले, तर अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शहराला बकालपणा आला आहे. पदपथ दुकानदारांनी व्यापले आहेत, हातगाडीवाले कुठेही गाड्या लावून खाण्याचे पदार्थ विकत आहेत. यात नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष देण्यापेक्षा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असाही आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला.
या वेळी बहुजन विकास आघाडीचे पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पी. टी. पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती चेतन पाटील, कामनिष राऊत, नचिकेत राऊत, निखिल गायकवाड, अनिल पाटील आदी उपस्थित होते.