
बोटिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा साधने
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे शहरातील विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव. सध्या शाळांना असलेल्या सुट्यांमुळे बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तलावांवर सायंकाळच्या वेळेस नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. मासुंदा, उपवन, आंबे-घोसाळे व खारिगांव या तलावांवर महापालिकेच्या वतीने बोटिंग सुविधा उपलब्ध असून याचा लाभ आबालवृद्ध घेत आहेत. बोटिंग करताना आवश्यक ती काळजी घेऊन सुरक्षेची साधने नागरिकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामुळे दुर्दैवी घटना घडणार नाही; पण नियुक्त ठेकेदाराकडे सुरक्षा साहित्य उपलब्ध असतानादेखील ते वापरले जात नाही, याची दखल घेत, बोटिंगदरम्यान सुरक्षा जॅकेट व नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.
मासुंदा तलाव हा ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी या तलावांवर बोटिंगसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते. सध्या महापालिका क्षेत्रात प्रमुख चार तलावांमध्ये बोटिंग सेवा ठेकेदारामार्फत सुरू आहे; परंतु पर्यटकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा न पुरविता पेडल बोट उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच प्रवासी बोटीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसविले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत आवश्यक ती खातरजमा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिले होते. त्यानुसार मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी मासुंदा व उपवन तलावाला भेट देऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली. मासुंदा तलावात बोटिंग करताना क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना प्रवासी बोटीत बसविणे, तसेच बोटींमध्ये सुरक्षा जॅकेट व इतर सुरक्षिततेची साधने दिसून आली नाहीत. ही बाब गंभीर असून पर्यटकांचा जीव धोक्यात घालणारी आहेत. याबाबत संबंधित ठेकेदाराला सक्त सूचना देण्यात आल्या असून बोटिंगमध्ये सुरक्षा जॅकेट घातल्याशिवाय बोट पर्यटकांच्या ताब्यात देऊ नये, तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बोटिंग परिसराच्या दर्शनी भागात नियमावली लावण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी मासुंदा व उपवन तलाव येथील बोटिंग सेवा चालविणाऱ्या ठेकेदाराला दिल्या आहेत.
.....
...अन्यथा बोटिंग सेवा बंद
शहरातील आंबे-घोसाळे तलाव व खारिगांव तलाव येथेही पाहणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. बोटिंग सेवेचा ठेका देताना सर्वसाधारण सभेने केलेल्या कराराचा भंग ठेकेदार करीत असल्यास ही बाब अत्यंत गंभीर व नागरिकांचा जीव धोक्यात टाकणारी आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचा भंग झाल्यास सार्वजनिक हिताचा विचार करून संबंधित ठेकेदाराची बोटिंग सेवा बंद करण्याचा इशाराही आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.
..........................................
नागरिकांनीही सतर्क राहावे
महापालिकेच्या तलावांमध्ये बोटिंगसाठी जाताना नागरिकांनीदेखील नियमांचे पालन करावे तसेच यासंबंधी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साधनसामुग्रीचा वापर करावा असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. तसेच याबाबत काही उणिवा दिसून आल्यास महापालिकेच्या तात्काळ निदर्शनास आणून द्याव्यात, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.