अभिजात शास्त्रीय संगीताची मैफल रंगली

अभिजात शास्त्रीय संगीताची मैफल रंगली

ठाणे, ता. २५ (बातमीदार) : अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा लाभलेला श्री गिरीश संझगिरी आयोजित पं. फिरोझ दस्तुर स्मृती समारोह दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात नुकताच पार पडला. चार दिवस रंगलेला या सांगितीक कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
पहिल्या सत्राची सुरुवात पं. शिवानंद स्वामी यांनी राग पुरिया कल्याणमधील ''आज सो बना'' आणि ''बहुत दिन बिते'' या दोन्ही बंदिश सादर करून केली. त्यासह संत तुकाराम रचित ''आवडे पंढरी'' हा अभंग सादर करून भक्तिरसमय वातावरण निर्माण केले. तर, दुसऱ्या सत्रात सुलेखा भट यांनी राग चंपाकलीमधील डॉ. प्रभा अत्रे यांनी रचलेल्या ''सावरिया मन भाया'' व ''अब तो मोरी बात'' आणि त्याला जोडून तराना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या समारोहाचे दुसरे सत्र ठाण्यातील युवा कलाकार भाग्येश मराठे व पंडित अशोक नाडगीर यांच्या शास्त्रीय गायनाने रंगले. ''बोल ना बोले हमसे पिया'' या भैरवीने दुसऱ्या सत्राचा समारोप झाला.
तिसर्‍या समारोहाची सांगता गिरीश संझगिरी आणि पंडित विद्याधर व्यास यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. गिरीश संझगिरी यांनी राग मुलतानीमधील एरी गोकुल गाव आणि एरी आली रे आणि पूरीया धनाश्रीमधील ''बित गये जुगवा, तोरी जय जय करतार'' रचना सादर करताना वेगवेगळे पैलू उलगडून दाखवले. तर, पंडित विद्याधर व्यास यांनी दुर्मिळ राग जयजयवंतीमधील लरा माई सजनी आणि जब ते लाडलिया आणि क्यू करत मोसे लाल या बंदिशी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. राग सादर करताना त्या रागाचे सौंदर्य आणि त्या रागाबद्दलचा विचार त्यांनी आपल्या गायनातून मांडले. त्यासह, पं. मुकुंदराज देव तबलावादन आणि अनंत जोशी यांच्या संवादिनीतून निघणारे मधुर सूर यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.

बंदिशीने रसिक मंत्रमुग्ध
भाग्येश यांनी भूपालीमधील ''नाद को साधो'' आणि ''नादविद्या अपरंपार'' अशा अनेक बंदीशी सादर केल्या. तर, पं. अशोक नाडगीर यांनी ''राग मारू बिहाग''मधील ''रसिया आवो ना'' आणि ''अंबुवा मोरी बात'' या दोन बंदीशी सादर केल्या आणि राग अडाणामधील ''जो करे आजा'' ही बंदिश उत्तम सादर करून रसिकांची मने जिंकली.

तिसर्‍या पुष्पात दुर्मिळ, अप्रचलित राग सादर
समारोहाचे तिसरे पुष्प डॉ. चैतन्य कुंटे संवादिनी व पंडित अश्विन दळवी सुरबहार या दोन कलाकारांनी वादन कला सादर करून गुंफले. या सत्राची सुरुवात डॉ. चैतन्य कुंटे यांच्या संवादिनी वादनाने झाली. त्यांनी गौरी, श्री, मारू बिहाग अशा तिहेरी छटांनी नटलेला ''गौरांजनी'' हा दुर्मिळ व अप्रचलित राग सादर केला. तर, ख्यातनाम सूर बहार वादक पं. अश्विन दळवी यांनी पखवाजाच्या साथीने राग मालकंस सादर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com