अडथळे आणले तरी ‘समृद्धी’ पूर्ण केला!

अडथळे आणले तरी ‘समृद्धी’ पूर्ण केला!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : ‘समृद्धी महामार्ग हे अनेकांचे स्वप्न होते; ते पूर्णत्वास आणून दाखवले. अनेक अडथळे आले, आणले गेले, मात्र मंत्री असताना स्वतः शेतकऱ्यांच्या खरेदीवर साक्षीदार म्हणून सही केली आणि तीन तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यामुळे शेतकऱ्यांना या प्रकल्पावर विश्वास बसला आणि नागरिकांनी विश्वासावर आपल्या जमिनी दिल्या. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण करू शकलो. तिसरा टप्पासुद्धा डिसेंबरअखेर पूर्ण होणार असून खऱ्या अर्थाने महामार्गामुळे राज्यातील शेतकरी समृद्ध होईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण पार पडले. यानिमित्ताने शिर्डीनजीक कोपरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते. रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहाव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

...
प्रत्येक जिल्हा रस्त्याने जोडणार!
डिसेंबर महिन्याच्या अखेर संपूर्ण समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे. विदर्भात या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरपर्यंत हा महामार्ग जाणार आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी असेल तर आव्हानात्मक कोणतेही काम पूर्ण होते, याचे समृद्धी महामार्ग हे जिवंत उदाहरण आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हा महामार्गाने जोडला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
...
शासन आपल्या दारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अनेक भव्यदिव्य कामांमुळे काही लोकांना पोटदुखी होऊ लागली आहे. त्यामुळे ते याच्या-त्याच्या दारी सध्या फिरत आहेत. पण आम्ही शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवीत आहोत, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे-अरविंद केजरीवाल यांच्या भेटीच्या निमित्ताने त्यांचे नाव न घेता लगावला.
...
पवार, ठाकरेंचा समृद्धीला विरोध : फडणवीस
संभाजीनगरात उद्धव ठाकरे आणि अहमदनगरमध्ये शरद पवार यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. मात्र त्याच ठिकाणी तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन अधिग्रहण सुरू केले. शेतकऱ्यांनी पुढे येऊन आपल्या जमिनी सरकारला दिल्या. त्यांचा विरोध डावलून शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
...
वेगापेक्षा जीवन अमूल्य
इंटेलिजन्स मॅनेजमेंट सिस्टीम बसत नाही तोपर्यंत समृद्धी महामार्गावरील ताशी वेग कमी करण्यात यावा, जरी १५० किलोमीटर ताशी वेगाने रस्त्याचे डिजाईन झाले असेल आणि १२० किलोमीटर ताशी वेगमर्यादा असेल, तरी वाहन चांगले नाही, त्याचे टायर नादुरुस्त असल्याने रस्त्यांवरील अपघात होत आहेत. वाहन चालवताना डुलकी लागण्याचे प्रकार होत असून परिणामी अपघात होत आहेत. दरम्यान, नागपूर-गोवा, मुंबई-गोवा, पुणे रिंगरोड, मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे काम सुरू केले जाईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले. नागपूर-गोवा महामार्गामुळे मराठवाड्याचे चित्र पालटणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
...
मार्चपर्यंत मिसिंग लिंक पूर्ण करणार!
ज्याप्रमाणे समृद्धी महामार्गाचे अडथळे दूर करून अवघ्या मोजक्या कालावधीत दुसरा टप्पा सुरू केला, त्याप्रमाणे मार्चअखेर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने येत्या वर्षात मार्चअखेर मिसिंग लिंकसुद्धा पूर्णत्वास आणण्यात येणार आहेत.
...
समृद्धी महामार्गावर १३ ॲग्रो प्रकल्प
राज्यातील नामवंत कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या नवनगरांमध्ये १३ अॅग्रो प्रकल्प आणणार आहे.

नागपूर ते जेएनपीटी जाण्यासाठी सुमारे १२ ते १५ तास लागत होते. मात्र आता हा कालावधी ७ ते ८ तासांवर आला आहे. त्यामुळे नागपुरातील शेतकऱ्यांना आपला माल अधिक वेगाने मुंबईत आणता येणार आहे.
...
८० किलोमीटरचा मार्ग
शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, ३० वाहनांसाठी भुयारी मार्ग, २३ हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझा, ३ इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ४ वे ब्रीज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र. ११, १२ आणि १३ चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून लांबी ८० किलोमीटर आहे. या टप्प्याच्या लोकार्पणामुळे ७०१ कि.मी.पैकी एकूण ६०० कि.मी. समृद्धी महामार्ग वाहतुकीस सुरू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com