
साहित्य चावडीवर रंगला संविधानाचा अमृत महोत्सव
विरार (बातमीदार) : आर्थिक निकष, देशाच्या विकासाठी प्रत्येक नागरिकाला राज्यघटना माहीत असणे, आवश्यक आहे. तसेच देशातील प्रत्येक शाळेत राज्यघटना शिकवली पाहिजे, असे मत स्मरणा शेटे यांनी मांडले. आजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य चावडीवर संविधानाचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन मंगलमूर्ती मंदिरात करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, समता, बंधुता या विषयांवर विवेचन करण्यात आले. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. बहुतांश महिला गृहिणी असूनही त्यांना राज्यघटनेविषयी चांगली माहिती आहे. त्यांच्या मनात देशाच्या प्रगतीसाठी, एकतेसाठी, समान हक्कांसाठी कळकळ आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. दिनेश कांबळे यांनी मांडले. चावडीच्या सरपंच ॲड. अर्चना जैन यांनी कायदे, कलमाविषयी माहिती दिली. नयन जैन, श्रुती रसाळ, किशोरी पाटील, अर्चना जुवाटकर, संजना वेतुरकर या संविधान चर्चेत सहभागी झाल्या होत्या.