
भिवंडी इमारत दुर्घटनेतील कुटुंबांना मदतीचा हात
भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : तालुक्यातील वळपाडा परिसरात इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख, तर १० जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.
वळपाडा परिसरातील इमारत २९ एप्रिल रोजी कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर `एनडीआरएफ'' जवानांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १० जखमी नागरिकांची सुटका करण्यात आली. मृतांचे नातेवाईक व जखमींना राज्य सरकारकडून मदत दिली होती. या दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत द्यावी, अशी विनंती राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली होती. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने मदत जाहीर केली आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात मृतांचे नातेवाईक व जखमींच्या बॅंकेतील खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार असल्याचे म्हटले आहे.