नऊ वर्षांत महागाई, बेरोजगारी वाढली

नऊ वर्षांत महागाई, बेरोजगारी वाढली

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई, ता. २९ : केंद्रातील भाजप सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असली तरी; गेल्या ९ वर्षांत देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. मोदी सरकार सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये सरकार आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही करत नाही, हे अत्यंत वाईट असल्याचा हल्ला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी चढवला.

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसने देशभरातील प्रमुख शहरात पत्रकार परिषदा घेऊन केंद्र सरकारची पोलखोल केली. मुंबईतील टिळकभवन येथे पी. चिद्मबरम यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. देशाचा कारभार संविधानानुसार चालतो, की नाही अशी चिंता वाढत आहे. केंद्र व राज्य सरकार यांच्यातील दरी वाढत आहे, ही आणखी एक चिंतेची बाब आहे. राज्य सरकारांच्या कार्यकारी अधिकारांमध्ये कपात केली. बिगर भाजपशासित राज्यांचे राज्यपाल ‘व्हाईसरॉय’सारखे वागत आहेत. संसदीय नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले जात आहे. खोट्या केसेस, तपासाच्या धमक्या देऊन राज्य सरकारांना अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.

चीनसारखा देश भारताचा भूभाग बळकावून बसला असताना संसदेत चर्चाही न होणे गंभीर असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. भाजपविरोधातील सर्व पक्ष देशभर एकास एक उमेदवार देऊ शकले तर किमान ४०० जागा निवडून येतील, असा आशावादही पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र-कर्नाटकचे गणित वेगळे
कर्नाटकातील विजयानंतर महाराष्ट्रातही आता विजय दृष्टिक्षेपात दिसतोय का या प्रश्नाला उत्तर देताना चिदंबरम म्हणाले, की कर्नाटक आणि महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. येथे आम्ही तीन पक्ष ‘मविआ’ म्हणून लोकांसमोर जात आहोत. आम्ही येथेही जनतेला न्याय देऊ, त्यांच्या इच्छा आकांक्षांशी नाते सांगू. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही आम्ही सत्ता राखू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com