
रस्ता ना फेरीवाला क्षेत्र घोषित करा
वसई, ता. ५ (बातमीदार) : जलद प्रवासासाठी सुकर ठरणाऱ्या सोपारा, म्हाडा, विरार मार्गावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे या रस्त्याला भविष्यात वाहतूक कोंडीचा विळखा निर्माण होईल. याबाबत ठाकरे गटाचे प्रवीण म्हाप्रळकर यांनी हा रस्ता ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्याची मागणी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे.
सोपारा मुख्य रस्ता ते म्हाडा हा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केला आहे. काही महिन्यांपूर्वी वसई- नालासोपारा- विरारमधील नागरिकांना वापरण्यासाठी हा मार्ग सुरू केला आहे. या मार्गामुळे विरार ते नालासोपारा हे अंतर ३ ते ४ मिनिटांत पूर्ण करता येते. भविष्यात याच रस्त्यालगत वसई-विरार महापालिकेचे मुख्य प्रशासकीय कार्यालय होणार असून तालुक्यातील नागरिकांची ये-जा मुख्यत्वे याच रस्त्याने होणार आहे; मात्र आता या रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू झाले आहे. नालासोपारा आणि विरार दिशेला फेरीवाल्यांनी बसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
रस्त्याच्या नालासोपारा आणि विरार दिशेने काही दिवसांपासून फेरीवाले बसत आहेत. हातगाड्या, पत्र्याच्या टपऱ्या यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येक १०० मीटरवर ‘नो फेरीवाला रस्ता’ या आशयाचे सूचना फलक लावावेत, अशी मागणी प्रवीण म्हाप्रळकर यांनी केली आहे.