गाळ काढण्याची कामे १५ दिवसांत पूर्ण करा : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

गाळ काढण्याची कामे १५ दिवसांत पूर्ण करा : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यात सुरू असलेल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी काल दिवसभर पाहणी केली. पावसाळा जवळ आल्याने पाणी साठा वाढवण्यासाठी तलाव, पाझरतलाव व गाव तलावातील शंभर टक्के गाळ काढण्याची कामे येत्या १५ दिवसांत पूर्ण करावीत. यासाठी आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर आदी मशिनरी वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी या वेळी दिले.
गावांमधील तलावांमधील जलस्रोतांचे बळकटीकरण व्हावे, पाणीसाठा वाढावा यासाठी जिल्ह्यात १० गावांमधील तलावांमधील गाळ काढण्याची कामे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून सुरू आहेत. यासाठी भारतीय जैन संघटना, वसुंधरा मंडळाचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्यातील भिवंडी तालुक्यातील कोन गाव, केल्हे, शहापूर तालुक्यातील कसारा, मुरबाड तालुक्यातील पऱ्हे व शिरवली या गावांतील कामांची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच तेथील सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधून कामांची माहिती घेतली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी अमित सानप, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रवीण खेडकर आदी या वेळी उपस्थित होते. भिवंडी तालुक्यातील कोन गावातील गावतलावाच्या कामांपासून पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. या तलावाशेजारीच शेती असल्याने कृषि विभागाच्या सहकार्याने तलावाच्या शेजारी कन्व्हर्जन करून शेतीसाठी या तलावाच्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तलावाच्या बांधावर बांबूची झाडे लावावीत जेणेकरून बांधावरील माती पुन्हा तलावात जाणार नाही. तसेच केलेल्या कामांचे डॉक्युमेंटेशन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
कसारा येथील पाझरतलावातील गाळ लवकरात लवकर काढण्यासाठी आणखी पोकलेन व इतर यंत्रांची संख्या वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या. मुरबाड तालुक्यातील पऱ्हे येथे आमदार किसन कथोरे, सरपंच सोमनाथ भोईर यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारीही या पाहणी दौऱ्याच्या वेळी उपस्थित होते. पऱ्हे गावतलावातील गाळ काढल्यामुळे येथील पाणीसाठा वाढणार आहे.
--
ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा
जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावी असून प्रशासनाने तलावांमधील गाळ काढण्याच्या कामाला आणखी गती द्यावी. ही योजना यशस्वी होऊन तलावातील पाणीसाठा वाढण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच तलावातील गाळ पाऊस सुरू होण्यापूर्वी काढण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com