
महामार्गावरील भीषण अपघात तीन ठार तर २ जण गंभीर जखमी
नालासोपारा, ता. ६ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसईच्या सातिवली पुलावर बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चारचाकीचा भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला; तर दोन जण गंभीर जखमी झाले. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या चारचाकीला हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नसून, ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एच. आर. २० ए. जी. ०२२६ या क्रमांकाची चारचाकी भरधाव वेगाने गुजरातच्या दिशेने जात होती. मुंबई वाहिनी सातिवली पुलाजवळ, बजरंग ढाब्यासमोर या चारचाकीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजक तोडत मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता, की चारचाकीमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना कळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले; तर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक दोन तासांसाठी पूर्णपणे खोळंबली होती. अपघातग्रस्त दोन्ही गाड्या बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.