एपीएमसी बाजारात आंबट गोड संत्र्यांची आवक

एपीएमसी बाजारात आंबट गोड संत्र्यांची आवक

Published on

वाशी, ता. ३१ (वार्ताहर) : थंडीची चाहूल लागताच बाजारात नागपुरी संत्र्यांच्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. सध्या वाशीतील एपीएमसीत नागपूर आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात संत्री दाखल झाली आहेत. त्यामुळे भावही काहीसा घसरला असून चवीला आंबट-गोड असणारी संत्री सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आली आहेत.
साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून संत्री बाजारात येऊ लागतात. मात्र, यंदा संत्र्यांच्या हंगामाला थोडासा उशीर झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तरीही आठवडाभरापासून एपीएमसी बाजारात संत्र्यांची चांगली आवक सुरू असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मंगळवारी (ता. २९) वाशीतील एपीएमसीत ५,१६० क्विंटल संत्र्यांची बंपर आवक झाली आहे. त्यामुळे भावदेखील काहीसे कमी झाले आहेत. आठवडाभरापूर्वी ३० ते ७० रुपये किलोने विकली जाणारी संत्री आकारमानानुसार सध्या ४० ते ५० रुपये किलोने विकली जात आहेत, तर आकाराने लहान आणि रस करण्यासाठी वापरण्यात येणारी संत्री २० ते ३० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहेत. संत्र्यांच्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत हंगाम सुरू राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेशहून संत्री येण्यास सुरुवात झाल्यावर भाव आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
-------------------------
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा संत्र्यांचे भाव निश्‍चितच कमी झाले आहेत. एपीएमसी बाजारात सध्या महिनाभरापासून कमी-अधिक प्रमाणात महाराष्ट्रातून संत्र्यांची आवक होत असून बाजारात उठाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बराचसा माल परिपक्व नसल्याने बाजारात येईपर्यंत खरब होत असून फेकून द्यावा लागतो आहे. त्यामुळे काहीसे नुकसानदेखील सहन करावे लागते आहे.
- मोहम्मद बशीर, फळ व्यापारी, एपीएमसी

------------
अवकाळीचाही फटका
यंदा नागपूर आणि नगर जिल्ह्यात संत्र्यांचे उत्पादन चांगले झाले असले तरी अवकाळी पावसाचा फटका याला बसल्याचे उत्पादक शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे संत्री बाजारात येण्यास काहीसा उशीर लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांनी संत्र्यांची वेळेआधीच तोडणी केल्याने संत्री पूर्णपणे तयार झालेली नाहीत. त्यामुळे बाजारात येईपर्यंत बरीचशी खराब झाल्याने फेकून दिली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, तरीही येत्या काळात चांगल्या प्रमाणात आवक बाजारात राहील आणि चांगला भाव मिळेल, असा विश्‍वास शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com