नियंत्रित भातलावणीने खर्चावर नियंत्रण

नियंत्रित भातलावणीने खर्चावर नियंत्रण

Published on

वाणगाव, ता. १९ (बातमीदार) : काही शेतकरी आपल्या शेतामध्ये अधिक उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नात जमिनीमध्ये दिवसेंदिवस रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. परिणामी त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होतो. नियंत्रित पद्धतीने भात लागवड करून हिरवळीची खते आणि माती परीक्षणानुसार खतांचा वापर केल्यास रासायनिक खते आणि कीटकनाशकांवर होणाऱ्या खर्चांवर नियंत्रण मिळवता येईल आणि उत्पादनातदेखील वाढ होण्यास मदत होऊ शकते, या उद्देशाने डहाणूतील कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन नियंत्रित पद्धतीने लागवड पद्धतीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.

रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकरी रासायनिक खते खरेदी करून आपल्या शेतामध्ये वापर करत आहे. परिणामी त्याचे दुष्परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहेत. भातपिक अवशेषाचा वापरामध्ये भात तुसाच्या राखेचा रोपवाटिकेत वापर करावा, तसेच चिखलणीवेळी भाताच्या पेंढ्याचा वापर करावा. भात तूसाच्या राखेतून सिलिकॉन पिकास उपलब्ध होवून रोपे कणखर होतात. भाताचा पेंढा चिखलणीच्या तीन ते चार दिवसांपूर्वी शेतात पसरून टाकणे व चिखलणी वेळी शेतात गाढावे. यामुळे पालाश उपलब्ध होवून भातपीक वाढीला मदत होते. नियंत्रित लावणी करण्यासाठी मनुष्याद्वारे, मनुष्यचलीत, भात यंत्राद्वारे किंवा स्वयंचलित भातलावणी मशीन वापरून नियंत्रित पद्धतीने लावणी करता येते.

अशी करावी लावणी?
नियंत्रित लावणी करताना दोरीवर २५ बाय १५ सेंमी अंतरावर खुणा करून दोरीच्या साह्याने ओळीत लावणी केली जाते. १५ बाय १५ सेंमी अंतरावर लावणी केली जाते. तसेच विविध प्रकारच्या यंत्राद्वारे लावणी करताना रोपातील अंतर २० बाय २० सेंमी किंवा १५ अथवा २० सेंमी आवश्यकतेनुसार ठेवून भातलावणी केली जाते.

माती परीक्षणानुसार खतांचा वापर
जमिनीच्या गरजेनुसार खतांचा वापर करावा. लावणीनंतर नत्र खताची आर्धी मात्रा, स्फूरद खताची पूर्ण मात्रा व पालाश खताची पूर्ण मात्रा द्यावी, तर लागवडीच्या एक महिन्यानंतर उर्वरित नत्र खताचा अर्धा आठवडा मात्रा द्यावी, असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जात आहे.

नियंत्रित पद्धतीने भातलावणी केल्याने दोन रोपांतील व दोन ओळीतील अंतर संतुलित राखल्याने रोपांच्या फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होते. पिकांमध्ये हवा खेळती राहते. त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचतो व कीड रोग प्रादुर्भाव कमी होतो. परिणामी पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
- सचिन तोरवे, उपकृषी अधिकारी, वाणगाव, डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com