मराठी धोक्याच्या रेषेवर
मराठी धोक्याच्या रेषेवर
ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे प्रतिपादन
ठाणे, ता. २ (बातमीदार) ः मराठी भाषा अशा नाजूक काळातून जात आहे, की आपली साहित्य आणि संस्कृती कधी नव्हे ती धोक्याच्या रेषेवर गेली आहे. त्यामुळे आपल्या मराठी भाषेची काळजी घेऊन ती उराशी बाळगण्याची गरज आहे. भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल, असे मत सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी शनिवारी ठाण्यात व्यक्त केले.
ठाणे महापालिकेच्या वतीने ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा नागरी सत्कार कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, सतीश सोळांकूरकर, अभिनेते सागर तळाशीकर, ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव, संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे, तसेच ठाण्यातील मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना विश्वास पाटील यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे सांगितले. मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठी वाङ्मय वाचवण्यासाठी संघर्ष करायचा आहे. लोकसहभागातून महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये किमान दोन ते तीन ‘मराठी भवन’ उभारले गेले पाहिजेत. मराठी भाषेचे संवर्धन करणे हा उठाव आहे आणि हा लोकांनीच पुढे नेला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मराठी शाळा बंद पडता कामा नयेत. मराठी शाळेतील कोणत्याही वर्गात एक विद्यार्थी असेल, तरी त्याला शिकवले पाहिजे. मराठी शाळेची तुकडी चालली पाहिजे. त्यातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर घडतील, असे त्यांनी नमूद केले. या वेळी प्रा. कविवर्य अशोक बागवे यांच्या प्रस्तावनीय आणि कवी दुर्गेश सोनार यांनी कवी सतीश सोळांकूरकर यांच्या कवितांचे रसग्रहण १६ अंकुरांचे ललित्य या संग्रहाचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेंद्र कोंडे यांनी केले.
पी. सावळाराम यांच्या आठवणी
ठाणे महापालिकेकडे ‘नगरपालिका’ म्हणून पाहतो, कारण गीतकार पी. सावळाराम या नगराचे पहिले नगराध्यक्ष होते, असे सांगत त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, शासकीय नोकरीत असताना ‘मामलेदार मिसळ’ची चव चाखल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
ठाणे पालिकेची साहित्य योगदानासाठी ग्वाही
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या वेळी सांगितले, की शहराचा विकास पूल, रस्ते बांधून होत नाही, तर त्या शहरातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वामुळे शहराला वलय प्राप्त होते. ठाणे शहरातील साहित्यिक व सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वांमुळे ठाण्याला हे वलय प्राप्त झाले आहे. त्यांनी ग्वाही दिली, की ठाणे महापालिका साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मागे उभी असते आणि यापुढेही महापालिका साहित्यिक - सांस्कृतिक कार्यक्रमात आपले योगदान देत राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

