कोकण पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे जलस्तर वाढ

कोकण पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे जलस्तर वाढ

Published on

कोकण पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे जलस्तरात वाढ
डहाणूत पाणी अडवण्याच्या व्यवस्थापनाची गरज असल्याची शेतकऱ्यांची भावना
कासा, ता. ९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात सूर्या नदीवर एमएमआरडीएने तीन वर्षांपूर्वी सुमारे ५० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या कोकण पद्धतीच्या पाच बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना मोठा दिलासा मिळत आहे; मात्र डिसेंबर महिना उजाडला तरी या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्याची प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
घोळ, आंबिवली, उर्से आणि चिंचारे परिसरात बांधलेल्या या बंधाऱ्यांमुळे कालव्याचे पाणी न पोहोचणारे डहाणू तालुक्यातील अनेक भाग लाभाच्या क्षेत्रात आले आहेत. वाढलेल्या जलस्तरामुळे उन्हाळी भातशेती, पालेभाज्या आणि भाजीपाला लागवडीची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. घोळ बंधाऱ्यात ०.१६२ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध होत असल्याने शेतीचा विस्तार वाढला आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांची संख्याही कमी झाली आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची समस्यादेखील लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
यावर्षी पाणी अडवण्यास विलंब झाल्यामुळे, नदीतील पाण्याचा मोठा प्रवाह थेट समुद्राकडे वाहून जात आहे, असे स्थानिकांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्यातच हे बंधारे कार्यान्वित झाल्यास पाण्याचा अधिक साठा करणे शक्य होते, असे जलसंधारण तज्ज्ञांचे मत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शासनाच्या मोठ्या गुंतवणुकीचा उद्देश पूर्ण होत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन जलसंपदा विभागाने तातडीने बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्याची व्यवस्था करावी. या व्यवस्थापनात होणारा प्रत्येक दिवसाचा विलंब हा शेतकऱ्यांच्या भविष्यातील पिकांसाठी मोठे नुकसानदायक ठरू शकतो. वेळेवर व्यवस्थापन झाल्यास उन्हाळी हंगामात पाण्याची शाश्वती मिळेल आणि परिसराची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल.
------------------
वेळेवर व्यवस्थापनाची गरज
पूर्वी ऑक्टोबर महिन्यातच या बंधाऱ्यांमध्ये पाणी रोखण्याची व्यवस्था केली जात असे. परंतु, यंदा पाणी अडवण्यास विलंब झाल्याने सूर्या धरणातून (कवडास व धामणी बंधारे) येणारे मोठे पाणी नदीपात्रातून वाहून वाया जात आहे. जलसंधारणाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आणि कृषीउत्पादनात वाढ साधण्यासाठी हे बंधारे वेळेत कार्यान्वित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ व्यवस्थापन करावे, अशी मागणी नागरिक आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
------------------
पूर्वी कालव्यांचे पाणी सर्वत्र पोहोचत नव्हते. पण या कोकण पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. मात्र सध्या पाणी अडवण्याची उपाययोजना न केल्याने पाणी वाया जात आहे."
- सतीश मेहेर, सामाजिक कार्यकर्ता
------------------
चार दिवसांत बंधाऱ्यांमध्ये पाणी रोखण्याच्या उपाययोजना केल्या जातील. त्यासाठी तत्काळ निविदा काढण्यात येणार आहेत."
- प्रवीण भुसारे, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com