प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकासमोर वाहतूक कोंडी

दिघा रेल्वेस्थानकाजवळ ठाणे-बेलापूर मार्गावर झालेली वाहतूक कोंडी
दिघा रेल्वेस्थानकाजवळ ठाणे-बेलापूर मार्गावर झालेली वाहतूक कोंडी

नवी मुंबई : ठाणे व नवी मुंबईच्या वेशीवरील प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकाजवळ ठाणे-बेलापूर मार्गावर होत असणाऱ्या दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दिघा रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार हे ठाणे-बेलापूर मार्गावरील ग्रीन वर्ल्ड या इमारतीजवळ होणार आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी मुंबईकडे जाण्यासाठी ऐरोली नॉलेज पार्कमार्गे शॉर्टकट असल्यामुळे या ठिकाणाहून रोज हजारो वाहने जातात. त्याचप्रमाणे ऐरोली नॉलेज पार्क येथे आयटी हब निर्माण झाल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच या सर्कलजवळ सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे बेदरकारपणे वाहने चालविली जातात. त्यामुळे अपघातही घडतात. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोलीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर विटावा येथील अरुंद सब-वेपासून दिघ्यापर्यंत सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. तर दिघा रेल्वेस्थानकाच्या प्रस्तावित असणाऱ्या स्थानकासमोरील रस्त्यावरून ऐरोली नॉलेज पार्ककडील रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी, ठाणे-बेलापूर मार्गावरून दिघ्याकडे जाण्यासाठी, ऐरोली नॉलेज पार्ककडील रस्त्यावरून एमआयडीसीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत असते. नवी मुंबई व ठाण्याची वेस असल्यामुळे वाहतूक पोलिसदेखील या वाहतूक कोंडीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. तर ऐरोलीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर विटावा सब-वेपासून दिघ्यापर्यंत अडीच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिघा रेल्वेस्थानक सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दिघा रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार ठाणे-बेलापूर मार्गावरील ग्रीन वर्ल्ड या इमारतीजवळ उभारले जाणार आहे. मुंबईकडे जाण्यासाठी पटनी कंपनीमार्गे शॉर्टकट असल्यामुळे या ठिकाणाहून रोज हजारो वाहने जातात. त्याचप्रमाणे ऐरोली नॉलेज पार्क येथे आयटी हब निर्माण झाल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. या सर्कलजवळ सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे बेदरकारपणे वाहने चालवण्यामुळे अपघात घडतात. यामुळे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा; तसेच सर्कल उभारण्यात यावे.
- सागर कांबळे, वाहनचालक.

प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकासमोरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून, या ठिकाणी सर्कल बांधण्यात येणार आहे; तर ऐरोली नॉलेज पार्क रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या वेळी दिघा रेल्वेस्थानकाजवळील रस्ता प्रशस्त करण्यात येणार आहे. यानंतर या ठिकाणच्या वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल.
- संजय देसाई, कार्यकारी अभियंता, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com