मुंबई - ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने आदिवासी साहित्य पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2017 मध्ये जाहीर केला; परंतु त्या निर्णयात सुधारणा केली जात असल्याने आदिवासी साहित्य पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांत आदिवासी साहित्याचा समावेश नव्हता. हा पुरस्कार दलित साहित्य या प्रकारात दिला जायचा. पुण्यातील ललित रंगभूमीचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी पाठपुरावा करून वेगळा आदिवासी साहित्य पुरस्कार देण्याची मागणी 2013 पासून लावून धरली होती. त्यानुसार 2017 मध्ये डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
हा पुरस्कार 2018 मध्ये कोणाला दिला जाणार, अशी विचारणा डॉ. केदारी यांनी माहितीच्या अधिकारात केली होती. त्यावर 23 ऑगस्ट 2017 रोजीच्या सरकारच्या निर्णयात सुधारणा करण्यात येत आहेत, त्यामुळे अंतिम निर्णय झाल्यानंतर नवीन आदेश जारी करण्यात येईल, असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणारा पहिला आदिवासी साहित्य पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे. डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने आदिवासी वाङ्मय पुरस्कार देण्यात सरकारकडून होत असलेल्या विलंबाबत डॉ. केदारी यांनी संताप व्यक्त केला आहे.
|