प्राण्यांनाही उन्हाचे चटके

प्राण्यांनाही उन्हाचे चटके

भायखळा - मुंबईत येणारे पर्यटक जिजामाता उद्यान म्हणजे राणीच्या बागेला हमखास भेट देतात. विविध प्राणी व पक्षी पाहायला मिळत असल्याने लहान मुलांचीही राणीच्या बागेला पसंती असते. परंतु, राणीच्या बागेतील प्राण्यांसाठी अपुरे पाणी, कोरडे हौद, तुटलेले पिंजरे अशी अवस्था असल्याने वाढत्या उन्हाच्या कडाक्‍याचा  प्राण्यांना त्रास होत असून, प्रशासन त्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भायखळ्यातील ‘लक्ष्य प्रतिष्ठान’कडून करण्यात येत आहे. राणीच्या बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून, उद्यानात अत्याधुनिक यंत्रसामग्री आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. 

काही दिवसांपासून मुंबईतील तापमान वाढत आहे. त्यातच राणीच्या बागेत प्राण्यांसाठी प्रशासनाकडून पुरेशा पाण्याची सोय करण्यात येत नाही. प्राण्यांसाठी बांधलेले पाण्याचे हौद कोरडे आहेत. त्यामुळे प्राण्यांना उन्हाच्या कडाक्‍याचा त्रास सहन करावा लागत आहे. बागेतील अनेक पिंजरे तुटलेले असल्याने प्राण्यांना इजा होण्याची शक्‍यता आहे. तसेच पेंग्विनसाठी प्रशासनाकडून सर्व सुविधा पुरवण्यात येत असल्या, तरी देशी प्राण्यांना पुरेशा सोई नसल्याची तक्रार लक्ष्य प्रतिष्ठानचे राजेश देशमुख व राजेश पवार यांनी केली. त्रुटींबाबत आयुक्तांकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला. 

आंतरराष्ट्रीय पद्धतीने कायापालट 
पेंग्विननंतर वाघ, सिंह, नीलगाय, सांबर हे प्राणी उद्यानात येतील. त्यांच्या नैसर्गिक अधिवासानुसार पिंजरे अत्याधुनिक करणार आहोत. वाघाच्या पिंजऱ्यात बांबूची झाडे, धबधबे असे नैसर्गिक वातावरण निर्माण केले जाईल, असे राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com