सहा चौकांत सिग्नल यंत्रणा

सहा चौकांत सिग्नल यंत्रणा

उल्हासनगर - शहरात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी वर्दळीच्या सहा चौकात सिग्नल यंत्रणा लावण्याची परवानगी दिली आहे. उल्हासनगर महापालिकेतर्फे लवकरच सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी दिली.

शहरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत. शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर या मुख्य रस्त्याचे नुकतेच रुंदीकरण करण्यात आले; मात्र तरीही रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहतुकीची समस्या कायम आहे. अरुंद रस्ते, सिग्नल यंत्रणेचा अभाव, बेशिस्त पार्किंग, बेकायदा बांधकामे, रिक्षा स्टॅण्ड, फेरीवाले, बेशिस्त वाहनचालकांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. शहरात एकूण सात हजार ५०० परवानाधारक रिक्षाचालक असून विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 

अधिकृत रिक्षा स्टॅण्ड २७ असून जवळपास ७० ते ८० च्या आसपास बेकायदा रिक्षा स्टॅण्ड असून ते चौका-चौकात असल्याने वाहतुकीला शिस्तच राहिलेली नाही. वाहतुक शिस्तीत व सुरळीतपणे चालावी, यासाठी महापालिका आणि पोलिसांनी फेरीवाले, रस्त्यांवरील बेकायदा बांधकामे, बेकायदा पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध संयुक्तरीत्या कारवाई करूनही काही फरक पडलेला नाही. 

नागरिकांना कोंडीतूनच मार्ग काढावा लागत असल्याने नागरिकांकडून वाहतूक समस्या सोडवण्याची मागणी होत होती. ती लक्षात घेऊन वाहतूक समस्या सोडवण्यासाठी  महापौर मीना आयलानी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उल्हासनगर वाहतूक पोलिस शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच महत्त्वाची बैठक झाली. यात सहा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सिग्नल यंत्रणा बसवण्यास मान्यता देण्यात आली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com