मुंबई - विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाविद्यालयांनी अग्निसुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत की नाही, याची नोंद अहवालात करण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठातर्फे लोकल इन्व्हेस्टिगेशन कमिटीला (एलआयसी) देण्यात येणार आहेत. या कमिटीने अग्निशमन यंत्रणेबाबत माहिती देणे टाळल्यास, अहवालच फेटाळून लावण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.
चर्चगेट येथील सिडनहॅम महाविद्यालयात लागलेल्या आगीत 16 हजार पुस्तके जळून खाक झाली होती. मुलुंड महाविद्यालयामध्ये लागलेल्या आगीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनांची दखल विद्यापीठाने घेतली आहे. महाविद्यालयांनी अग्निसुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याचा उल्लेख एलआयसी कमिटीने अहवालात करावा, असे निर्देश कमिटीला देण्यात येणार आहेत. या कमिटीने महाविद्यालयातील अग्निसुरक्षेची पाहणी करून त्याची माहिती अहवालात देणे बंधनकारक आहे.
|