मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी बुधवारी (ता. 31) केला. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची मंजुरी नसतानाही परीक्षा विभागाने मुखपृष्ठ बदलत नवीन उत्तरपत्रिका छापल्या. यामध्ये गैरव्यहार झाला असून, याच्या चौकशीसाठी सरकारने तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत 450 हून अधिक परीक्षा घेतल्या जातात. गोपनीयतेच्या नावाखाली जुन्या उत्तरपत्रिका संपवण्याचे कारण देत विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे उत्तरपत्रिकेचे मुखपृष्ठ बदलण्याचा आणि नवीन उत्तरपत्रिका छापण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला; मात्र उत्तरपत्रिकांचे मुखपृष्ठ बदलण्याची आवश्यकता नसल्याबाबत या बैठकीत सदस्यांचे एकमत झाले आणि नव्या उत्तरपत्रिका छापण्याचा प्रस्ताव नामंजूर केला गेला; परंतु त्यानंतरही परीक्षा मंडळाने उत्तरपत्रिकेवर नाव छापण्याचा हट्ट कायम ठेवत नवीन उत्तरपत्रिका छापण्यात आल्या.
त्यामुळे कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेता उत्तरपत्रिका छापण्याचा परीक्षा विभागाचा हा अट्टहास का? परीक्षा विभागाच्या या निर्णयाच्या चौकशीची गरज असून, यातील गैरव्यवहाराचे धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत, किती लाखांची खरेदी विनापरवाना झाली आहे, याची सखोल चौकशी माजी न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी ओव्हाळ आणि मुक्ता शिक्षक संघटनेचे महासचिव प्राध्यापक सुभाष आठवले यांनीही केली आहे. तसेच चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत आताचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशीही मागणी ओव्हाळ यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.