मुंबई ः उरण तालुक्यात गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून, रात्री-अपरात्री बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन गुरांची चोरी केली जात आहे. ऐन हंगामात टोळीने धुमाकूळ घातल्याने पशुधन संकटात आले आहे. पोलिस आता या टोळीला कधी जेरबंद करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
उरण पूर्व भागातील अनेक गावांमध्ये सध्या पशुधन कमी झाले असले तरी काही गरीब शेतकरी घरातील दूध-दुभत्यासाठी व शेतीच्या कामांसाठी काही पशुधन सांभाळून आहेत; मात्र या पशुधनावर काही चोरट्यांची नजर पडली असून, गावठाणांत रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी एक ते दीड वर्षाच्या चार गुरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र गुरांच्या आवाजाने येथील नागरिक जागे झाले. आरडाओरड झाल्याने गुरे चोरणारी टोळी तेथून पळून गेली. नागरिकांनी गस्तीला असणाऱ्या पोलिसांना बोलावून त्यांच्या मदतीने पशुवैद्यकीय अधिकारी संतोष ढाबेराव आणि प्रकाश गावंड यांच्याकडून रात्री 3 वाजता त्या गुरांवर औषधोपचार केले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जनावरे चोरट्यांच्या तावडीतून वाचली असली तरी असेच प्रकार अनेक वेळा घडले आहेत.
काही वर्षांपूर्वी इंद्रायणी डोंगराजवळील रस्त्यांवर अशीच टोळी पकडण्यात आली होती. त्याच्यावर गुन्हे दाखल करून 15 गुरांची सुटका केली होती. असे अनेक प्रकार जांभूळपाडा, चिरनेर, कलंबुसरे, द्रोणागिरी भागात घडले आहेत. शेतकऱ्यांचे पशुधन वाचण्यासाठी पोलिसांनी या टोळ्यांना मदत करणाऱ्या एजंटांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
|