मुंबई - वरळी येथे औषधांच्या प्रयोगशाळेत लागलेली आग आटोक्यात आणताना विषारी धुरामुळे गुदमरलेल्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांची प्रकृती स्थिर आहे. या 12 जणांवर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अग्निशमन दलाने चौकशी सुरू केली आहे.
वरळीतील औषध प्रयोगशाळेला शनिवारी (ता. 29) सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास लागलेली आग मध्यरात्रीनंतर आटोक्यात आली. रसायनांच्या साठ्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. त्यामुळे अग्निशमन दलातील जवानांना श्वास घेण्यास त्रास झाला. उपप्रमुख अग्निशमन अधिकारी आर. ए. चौधरी यांच्यासह 12 जवान गुदमरले. त्यांच्यात स्वप्नाली चिकने आणि स्वाती सातपुते या महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. स्वप्नाली चिकने यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
आगीच्या प्रकरणी अग्निशमन दलाने चौकशी सुरू केली असून, अहवाल लवकरच तयार होईल. आग लागताच कर्मचारी कंपनीच्या बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आगीचे नेमके कारण आणि प्रयोगशाळेत आवश्यक अग्निशमन यंत्रणा होती का, हे समजू शकेल, असे अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
|