माणगावात भाजीपाल्यासह माशांच्या दरात वाढ

परतीच्या पावसाचा फटका भातशेतीसह भाजीपाल्यांच्या उत्पादनावर झालेला आहे.
परतीच्या पावसाचा फटका भातशेतीसह भाजीपाल्यांच्या उत्पादनावर झालेला आहे.

माणगाव (वार्ताहर) : अवकाळी आणि परतीच्या पावसाचा फटका भातशेतीसह भाजीपाल्यांच्या उत्पादनावर झालेला आहे. मुख्य बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक घसरल्याने बाजारभाव वाढू लागले आहेत. तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीवर येत असलेल्या वादळांमुळे मासेमारीवर बंदी आली आहे. परिणामी, माशांची आवकही बाजारात कमी असल्याने त्यांचे दरही आकाशाला भिडले गेले आहेत.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यासह तालुक्‍यात भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यातच आता नगदी पिकांवरही संकट आले आहे. भाजीपाल्यांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत. पुणे, नाशिक, वाशी, सातारामधील घाऊक बाजारपेठेतील आवक कमी होत असल्याने या आठवड्यात कोथिंबीरचे भाव डबल झाले आहेत. किरकोळ बाजारात गाजर ८० ते १००, मटार व शेवगा १६० रुपये किलो, तर कोथिंबीरची जुडी ५० रुपये झाली आहे. टॉमेटो ६० ते ८० रुपये किलो दर आहेत. भेंडी, वांगी, कारले, फ्लॉवर, कोबी यांमध्ये किलोमागे १५ ते २० रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यातच कांद्याने रडवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, मच्छी व मटणांच्या वाढलेल्या दरामुळे मांसाहार करणाऱ्यांबरोबरच शाकाहारीवाल्यांचेही हाल झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

वादळाचा मांसाहार खवय्यांना
कोकणातील किनारपट्टीवर गेली अनेक दिवस आलेला क्‍यार व कमी दाबाचा पट्ट्यामुळे झालेले वादळ यामुळे मासेमारीवर बंदी आहे. माशांचा अपुऱ्या तुटवड्यामुळे मासळी बाजारात मच्छीचे दर गगनाला भिडले आहेत. त्याच वेळी बाजारातील मटणाचे दरदेखील २० ते ४० रुपयांनी वाढल्याने सामान्य नागरिकांना महागाईची समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. एकंदरीत मांसाहारी खवय्यांमध्येही नाराजी पसरली आहे.

पुण्यातून माल आणतो; परंतु अवकाळी पडलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवकही कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात चढ्या दराने भाजी घ्यावी लागते. परिणामी, जास्त भावाने भाजी विकावी लागते. १० रुपयाला विकणारी कोथिंबीर आता ५० ला विकत आहोत. 
- बाळा वाटोरे, भाजीविक्रेता, गोरेगाव 

सध्याच्या परिस्थितीत बाजारात भाजीपाला तीन ते चार पटीत दराने मिळत आहे. त्याचबरोबर मच्छी, मटणही महागले असल्याने महिन्याचा बजेट कोलमडला आहे. जर अशीच परीस्थिती राहिली, तर आमच्यासारख्या गरीब नागरिकांनी काय करावे? 
- वैदही सत्वे, गृहिणी, उमरोली, माणगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com