नवी मुंबई - भाजपला पक्षात घेण्यासाठी चांगल्या व्यक्ती भेटत नाहीत; त्यामुळे भाजप नेत्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पक्षात घेऊन त्याचा "वाल्मीकी' करावा. ते मोठे काम होईल. तसे झाल्यास आम्ही दाऊदचे पाद्यपूजन करून उरणारे पाणी पिऊ, अशा शब्दांत शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) माजी आमदार विवेक पाटील यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर खोचक टीका केली.
"भाजपमध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मीकी होतो', असे वक्तव्य गडकरी यांनी भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केले होते. "सकाळ'च्या बेलापूर कार्यालयात झालेल्या "कॉफी विथ सकाळ' या कार्यक्रमात पाटील यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. 'सत्तेसाठी हपापलेले भाजप नेते कोणत्या थराला जातील, याचा काही नेम नाही. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना पक्षात घेऊन त्यांची पाठराखण करण्यासाठी असे वक्तव्य केले जात आहे,'' असे मत व्यक्त करतानाच पनवेल महापालिकेच्या निवडणुकांमध्ये हा पक्ष गुन्हेगारांना उमेदवारी देत आहे, या आरोपाचा पुनरुच्चार पाटील यांनी केली.
भाजप नेते खोटारडे
'भाजपचे नेते जनतेची दिशाभूल करणारे व खोटे वक्तव्य करत आहेत. पनवेल शहरातून जाणारा उड्डाण पूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आम्ही उभारले, असे दिशाभूल करणारे वक्तव्य हे नेते करीत आहेत. शेकापने सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या भूखंडावरील झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे काम माझ्या संस्थेमार्फत केले. त्यासाठी 35 लाख रुपये खर्च झाले. त्यानंतर भूखंड मोकळा होऊन आंबेडकर स्मारकाची इमारत उभी राहिली. न्यायालयाच्या इमारतीच्या कामाबाबत मी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली.
त्यावर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर या इमारतीचे काम झाले; मात्र त्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम भाजप नेत्यांनी केले,'' असे पाटील म्हणाले.
|