नवी मुंबई : नवी मुंबई प्लॅस्टिकमुक्त करण्याचा सूर छेडत, कबीराच्या सर्वकालिक दोह्यांचा आनंद घेत मान्यवरांच्या साथीने आणि हजारोंच्या साक्षीने नवी मुंबई परिसरातील सेंट्रल पार्कमध्ये "सकाळ' (मुंबई) चा 43 वा वर्धापन दिन आगळ्यावेगळ्या जल्लोषात साजरा झाला.
अभिनेत्री जुही चावला, दिग्दर्शक महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री अश्विनी भावे, अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे अशी मान्यवरांची मांदियाळीच या कार्यक्रमात सहभागी झाली होती. जुही चावला यांनी प्लॅस्टिकमुक्तीची शपथ उपस्थितांना दिली. त्यांना साथ देण्याची हाक देत सुरेल गाणेच छेडले. स्वप्नील जोशीने "सकाळ'च्या या प्रयत्नांचे कौतुक करत प्रेक्षकांना आपल्या नव्या चित्रपटातील गाण्यांवर नाचवलेही. या साऱ्यावर कळस चढवला कबीर कॅफेने...
"सद्गुरू साहिबाने मेरा भरम तोड दिया...' असे म्हणत त्यांनी उपस्थितांच्या डोळ्यावर चढलेला प्लॅस्टिकचा पडदा दूर करण्याचा प्रयत्न केला.
कबीराची अनुभूती अंतकरणाला देतानाच त्यांनी शरीरालाही ताल देणे भाग पाडले. या वेळी "सकाळ' माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मुख्य संपादक श्रीराम पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप द्विवेदी, नवी मुंबई पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते. सुरवातीला राम ट्रायो बॅंडने सादर केलेल्या सुफी गायकीने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
मुंबई: प्लॅस्टिकमुक्तीच्या मोहिमेअंतर्गत "सकाळ'च्या वर्धापन दिनानिमित्त खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये अभिनेत्री जुही चावला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सनदी अधिकाऱ्यांसह हजारो नागरिकांनी "कबीर कॅफे'च्या सुरात सूर मिसळून प्लॅस्टिकमुक्तीची सुरेल शपथ घेतली.
|