महाड-रायगड रस्त्याच्या रुंदीकरणाचा "असा' ही फटका; सहा गावांत पाणीसंकट 

महाड : तेटघर गावाजवळ जलवाहिनी फुटल्‍याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे.
महाड : तेटघर गावाजवळ जलवाहिनी फुटल्‍याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे.

महाड : महाड-रायगड रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान जेसीबीमुळे किंजळोली बुद्रूक ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी डिसेंबरमध्ये तेटघर गावाजवळ फुटली होती. खंडित झालेल्या जलवाहिनीमुळे दरदिवशी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे किंजळोली बुद्रूक ग्रामपंचायत हद्दीतील सहा वाड्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास राष्ट्रीय महामार्गाच्या महाड कार्यालयावरच मोर्चा नेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

15 वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण विकास योजनेतून मांडले विभागातील किंजळोली बुद्रूक ग्रामपंचायतीला लाखो रुपये खर्च करून गांधारी नदीतून जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. किंजळोली बुद्रूक ग्रामपंचायत हद्दीत मुळगांव, मोहल्ला, बौद्धवाडी, सोनारकोंड, पार्टेकोंड, दाभेकर कोंड, आयरे कोंड ही सात गावे आहेत. आयरे कोंड डोगरात असल्याने या योजनेचा लाभ या गावाला मिळत नाही. सहा गावे या योजनेवर तहान भागवत आहेत. त्यामुळे किंजळोलीला भेडसावणारी पाणीटंचाई काही वर्षे आटोक्‍यात आली होती. 

सध्या किल्ले रायगड संवर्धनाचे काम प्रगतिपथावर असून रायगडाकडे जाणाऱ्या महाड-रायगड या 24 किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचेही काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वी हा रस्ता राज्य मार्ग म्हणून ओळखला जात असे. रायगड संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिलेल्या महाड-रायगड रस्त्याच्या रुंदीकरणाचाही समावेश करण्यात आला आहे. रुंदीकरणाचे काम पुण्याच्या पाटील इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीने घेतले आहे. कंपनीने रस्त्याच्या प्रत्यक्ष कामासाठी उपकंत्राटदार नेमले आहेत. 

नातेखिंडीपासून ते किल्ले रायगडापर्यंत गांधारी नदीतून रस्त्याच्या पलीकडे पूर्व दिशेला असलेल्या गावांना जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. किंजळोली बुद्रक ग्रामपंचायतीसह गोंडाळे, लाडवली, करंजखोल, कोळोसे, काचले, नांदगाव, तळोशी, खर्डी, चापगांव, वाळसुरे, वरंडोली आदी ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. उपकंत्राटदाराने ग्रामस्थांच्या पाण्याच्या जलवाहिनींची प्रत्येक ठिकाणी तोडफोड केली आहे. त्यामुळे पाणी मुख्य साठवण टाकीत जात नसल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा 
किंजळोली बुद्रूक ग्रामपंचायतीची जलवाहिनी गेल्या महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात कंत्राटदारांनी स्वखर्चाने जलवाहिनी दुरुस्त न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

रस्तारुंदीकरण होत असताना उखडलेल्या जलवाहिनींच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर उखडलेल्या जलवाहिन्यांची डागडुजी करण्यात येईल. 
- अभिजित झेंडे, कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग. 

सरकारला पाठवलेला प्रस्ताव हा कोतुर्डे धरणातून महाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांच्या पुनर्वसनासाठी आहे. प्रस्तावात किंजळोली बुद्रक ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीचा उल्लेख नाही. त्यामुळे किंजळोली ग्रामपंचायतीला न्याय द्यावा, नाहीतर राष्ट्रीय महामार्गाच्या महाड कार्यालयावरच मोर्चा काढण्यात येणार आहे. 
- दत्त्ताराम महाडिक, ग्रामस्थ. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com