मोग्रज ग्रामपंचायतमधील फणसवाडीतील डवरे आटले

neral.
neral.

नेरळ - कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या भगताचीवाडीच्या दोन लहान आदिवासी वाड्यात असलेले पाणी साठे आटले आहेत. शासनाच्या कोणत्याही पाणीपुरवठा योजना या दोन्ही वाड्यात पोहचल्या नाहीत. डवऱ्याचे पाणी पिणारे हे आदिवासी आता आश्रमशाळेच्या मागे असलेल्या नदीवर जाऊन पाणी आणत आहेत.

मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये शासनाची आदिवासी आश्रमशाळा असून त्या अलीकडे फणसवाडी ही 20 घरांची वस्ती आहे. आपली तिसरी पिढी राहत असलेल्या आदिवासी वाडीमध्ये शासनाची अद्याप कोणतीही पाणीपुरवठा करणारी योजना पोहचली नाही. फणसवाडी मधील रहिवासी वाडीच्या खालच्या भागात असलेल्या टेकडी खाली एक पाण्याचा झरा आहे. हा झरा पावसाळा आणि उन्हाळा चार महिने वगळता पाणी पुरवठा करीत असतो. त्या ठिकाणी अनेक वर्षात पाणी पोहचावे यासाठी कोणतेही प्रयत्न पाणी पोहचवण्यासाठी झाले नाहीत. त्यामुळे झऱ्याचे पाणी आटले की आदिवासी महिला फणसवाडी मधून पायी निघतात आणि शासकीय आश्रमशाळेच्या मागे असलेल्या ओहोळावर खड्डे खोदून पाण्याचा शोध घेतात. उन्हाळ्यात त्या ओहोळ सारखी असलेल्या नदीमध्ये असंख्य डवरे खोदलेले दिसून येत आहेत.वाडीतून ओहोळ पर्यन्त असलेली पायपीट ही किमान दीड किलोमीटर अंतराची असून नाईलाज म्हणून हे आदिवासी लोक वर्षानुवर्षं ते सहन करीत आहेत.

या दोन वाड्यांमध्ये पिण्याची पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांनी फणसवाडी मधील त्या झऱ्याच्या ठिकाणी विहीर बांधून घेण्यासाठी आदिवासी उपयोजना कार्यालयाकडून विहीर मंजूर करून घेतली आहे. त्यास किमान वर्षाचा कालावधी लोटला असून विहिर खोदावी लागणार त्या ठिकाणाची जमीन शेजारी असलेल्या धोत्रे गावातील व्यक्तीची आहे.तर फणसवाडी मधून त्या विहिरीवर पोहचण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या जमीन ही पिंगळस येथील व्यक्तीची आहे.ते दोन्ही शेतकरी आपल्या जमिनीचा भाग देण्यास टाळाटाळ करीत आहेत.त्यामुळे विहीर मंजूर असून ती बांधून पूर्ण होत नाही आणि परिणामी दोन्ही वाड्यांमधील उन्हाळयात निर्माण होणारी पाणीटंचाई कमी होत नाही. त्याचवेळी वाडीमध्ये लवकरच पाणी येईल अशी खात्री असल्याने आदिवासी ग्रामस्थांनी तेथे अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स या संस्थेकडून पाणी साठवण टाक्या बांधून घेतल्या आहेत.पण त्या टाक्यात अद्याप पाण्याचा थेंब पोहचला नाही.

वामन भगत-आदिवासी ग्रामस्थ 
आमची दुसरी पिढी ज्या झऱ्याचे पाणी पिऊन आयुष्य जगले, त्या ठिकाणी विहीर बांधून झाली तर आमच्या दोन्ही वाड्यातील पाणीटंचाई किमान 20 वर्षासाठी संपून जाईल.

विलास भला-उपसरपंच, मोग्रज ग्रामपंचायत 
विहीर बांधण्यासाठी जमीन द्यावी यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेणार असून त्यातील एक व्यक्ती ही दुसऱ्या ग्रामपंचायत मधील आहे. मात्र ग्रामपंचायत भागात सर्व ठिकाणी पाणीटंचाई असून शासकीय ट्रँकर सुरू झाल्यावर त्यातून फणसवाडीला पाणी पुरवठा करून तेथील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com