मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत.
राज्याच्या सहा महसुली विभागांपैकी नागपूर आणि कोकण वगळता पुणे, औरंगाबाद, अमरावती, नाशिक या चार महसुली विभागांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक टॅंकरची संख्या मराठवाड्यात आहे. या विभागात 339 गावे आणि वाड्यांसाठी 266 टॅंकर सध्या सुरू आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत 106 गावांसाठी 102 टॅंकर होते. या विभागातील एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात 260 गावे व वाड्यांवर सध्या 184 टॅंकर सुरू आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत ही संख्या 106 गावांत 102 टॅंकर अशी होती. गेल्यावर्षी औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील इतर सात जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई नव्हती. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, नगर या जिल्ह्यांत टॅंकर आहेत, तर अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्यात 62 गावांत 62 टॅंकरची सोय करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत सर्व विभागांत 492 गावे, 1736 वाड्यांसाठी 449 इतके टॅंकर पाणीपुरवठा करीत होते, तर यंदा 509 गावे, 328 वाड्यांसाठी 513 टॅंकर पाणीपुरवठा करीत आहेत.
घटता जलसाठा
17.12 टक्के नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांत
17.17 टक्के मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पांत
12.45 टक्के मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत
|