मुंबई - रेल्वेगाड्यांतील अपंगांसाठी आरक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या रेल्वे पोलिसांवर कोणती कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 10) रेल्वे प्रशासनाकडे केली.
नितीन गायकवाड यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. आतापर्यंत 105 जणांना दंड करण्यात आला आहे; तसेच त्यांना ताकिदही दिली आहे, असे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. ही कारवाई अपूर्ण असून अशा पोलिसांवर कोणती कठोर कारवाई केली, याचा तपशील देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर फेब्रुवारीमध्ये सुनावणी आहे. याचिकादाराच्या वतीने ऍड. जयदीर टन्ना यांनी बाजू मांडली. अपंगांच्या डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसवावे, त्यांना बसण्यासाठी चांगली आसने द्यावी, त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारे डब्यांची व्यवस्था असावी, असे निर्देश रेल्वेला यापूर्वीच देण्यात आले आहेत; मात्र अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
|