मुंबई - ठाणे जिल्ह्यात महिलांसाठी विधी महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीबाबत बार कौन्सिल ऑफ इंडियाने तातडीने तपशीलवार अभ्यास करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले.
बॉम्बे बार असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ठाणे जिल्ह्यात महिलांसाठी विधी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला आहे. सरकारनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली असून त्यासाठी आवश्यक असणारे विद्यापीठाचे अनुदानही मंजूर केले आहे; मात्र बार कौन्सिल ऑफ इंडियाने अद्याप तेथील जागेची आणि पायाभूत सुविधांची पाहणी केलेली नाही. याबाबत बार कौन्सिलला निवेदनही देण्यात आलेले आहे, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली; मात्र बार कौन्सिलच्या वतीने या आरोपांचे खंडन करण्यात आले.
महाविद्यालयासाठी कायमस्वरूपी किंवा भाडे तत्त्वावर जागा असल्यास कौन्सिलच्या वतीने पाहणी केली जाते; मात्र संबंधित जागा केवळ डिसेंबरपर्यंत भाडे तत्त्वावर आहे, असे कौन्सिलच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर अन्य ठिकाणी संस्थेने जागा पाहिली असून डिसेंबरअखेर ती ताब्यात मिळेल, अशी माहिती याचिकादारांच्या वतीने देण्यात आली.
|